Disclaimer







     
            Welcome to Marathistories .

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~

Friday 9 February 2018

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~ भाग ०६

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~
मूळ लेखक - नारायण धारप आणि डॉ. अरुण मांडे

भाग ०६


तो विषय तिथंच संपला होता. टिपणवही बघत असताना पारूचा सगळा प्रसंग त्यांच्या डोळयासमोर उभा राहिला होता.

पारू धोंडिबा म्हातरे
अनंत सीताराम जोशी

सरदार रावते यांच्या वाड्यात पुन्हा जायची संधी मिळाली तर या दोघांना सोबत घेऊन जायचं त्यांनी नक्की केलं. तसं झालं तर दोन गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता होती. सरदार रावते यांच्या वाड्याचं गूढ उकललं असतं, आणि त्यांची उपपत्ती खरी आहे की नाही हे पण सिद्ध झालं असतं.

जेजींनी आपल्या टिपणवहीत तशी नोंद केली.

आता वाट पाहात राहणं एवढंच त्यांच्या हातात होतं.

~~~~~~~~~

पण त्यांना फार वाट बघावी लागली नाही. दुसऱ्याच दिवशी त्यांना संभाजीरावांचा फोन आला.

"जेजी, ताबडतोब माझ्याकडे या.." ते म्हणाले.

"काय विशेष..?"

"आल्यावर सांगतो..," असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला.

जेजींना अतिशय नवल वाटलं. ताबडतोब निघण्यासारखं असं काय तातडीचं काम निघालं असेल बरं..?

फोन खाली ठेवून ते निघालेच.

बंगल्याच्या मोठ्या दाराची घंटी वाजवताच दार उघडलं. पण दारात गडी नव्हता, प्रत्यक्ष संभाजीरावाच दारात उभे होते.

"या या, मी तुमचीच वाट पाहात होतो. आपण इथंच बसू.."

बाहेरच्या हॉलमध्ये सोफासेट होता. संभाजीराव सोफ्यावर बसले. जेजी त्यांच्यासमोरच्या सोफ्यावर बसले.

तेवढ्यात गडयांनं चहा आणून दिला.

चहा घेईपर्यंत संभाजीराव काही बोलले नाहीत. त्यांचा चेहरा विचारमग्न होता. चिंतामग्न होता.

गडयांनं चहाचे कप आतमधे नेत असतानाच बाहेर हॉर्नचा आवाज ऐकू आला. संभाजीराव लगेच उठले आणि म्हणाले, "जेजी, आपल्याला माहूलगावी जायचंय. आमच्या वाड्यावर."

"आत्ता..?" जेजींना अतिशय आश्चर्य वाटलं.

"हो.."

"काही विशेष घडलंय का..?"

"हो, काय ते वाटेत सांगतो.." मग अचानक थांबून त्यांनी भानावर येऊन विचारलं, "पण जेजी, तुम्हाला वेळ आहे ना..? हे मी तुम्हाला आधीच विचारायला हवं होतं."

"हो भरपूर आहे. काही काळजी करू नका." असं म्हणून जेजीपण उठले. दोघंही बाहेर आले.

फाटकपाशी निळ्या रंगाची एक जुनी ऑस्टिन उभी होती. पन्नासचं मॉडेल असावं. पण तिच्या चमकदार रंगावरून तिची देखभाल चांगली होत असावी असा अंदाज करता येत होता.

आम्हाला बघताच कारचं दार उघडून एक इसम बाहेर आला. तपकिरी रंगाचा सफारी घातलेला तो माणूस ड्रायव्हर असावा. त्यानं संभाजीरावांना सलाम केला.

"रसूल आता घरी जा. आज कार मी चालवणार आहे." संभाजीराव म्हणाले.

"ठीक आहे साहेब.." असं म्हणून तो निघून गेला. "बसा.." संभाजीरावांनी जेजींसाठी पुढच्या सीटचं दार उघडलं होतं. ते आत बसल्यावर संभाजीराव कारला वळसा घालून ड्रायव्हरसीटचं दार उघडून आत बसले. आणि त्यांनी कार चालू केली.

संभाजीराव सफाईने कार चालवत होते. रस्त्यावरचे सायकलींचे, मोटारसायकलींचे अडथळे, चौकाचौकातले सिग्नल, रस्ता ओलांडणारे पादचारी, बसेस आणि रिक्षा यांच्या भूलभुलैयातून सुखरूपपणे बाहेर निघून पुण्याबाहेर पडायलाच आम्हाला एक तास लागला. एक लहानसा घाट चढल्यावर त्यांना बोलायला फुरसत मिळाली.

"गणपत मिस्त्रीचा सकाळी फोन आला होता. वाड्यावर गडबड झालीय म्हणत होता."

संभाजीरावांनी जेजींना सांगायला सुरुवात केली.

"गडबड म्हणजे..?" जेजींनी विचारलं.

"चोरी झालीय.." एवढंच सांगून ते गप्प बसले.

"वाड्यात चोरी होण्यासारखं काही होतं का..?" जेजींनी विचारलं.

"काहीही नाही. सगळा वाडा रिकामा आहे. वाड्यात कुणी नसतं असं बघून चोर आत घुसले असणं शक्य आहे. पण त्यांना काहीही मिळालं नसणार." संभाजीराव म्हणाले.

"पण चोरी झाली हे मिस्त्रीला कसं समजलं..?" जेजींनी विचारलं.

"ते काही त्यानं सांगितलं नाही. फोनवर मला सांगताना तो खूप घाबरला होता. मी त्याला वाड्यावर बोलावलंय. आता भेटला म्हणजे आपल्याला सविस्तर विचारता येईल."

त्यानंतर संभाजीरावांनी आपलं सगळं लक्ष गाडी चालवण्याकडे लावलं. त्यांचा चेहरा विचारमग्न दिसत होता. जेजींनी मग त्यांना काही विचारलं नाही. वाड्यावर इतक्या लवकर जायला मिळेल अशी त्यांची अपेक्षा नव्हती. हे अगदीच अनपेक्षित घडलं होतं. त्यामुळे त्यांनी काही तयारीपण केली नव्हती. म्हणजे मानसिक तयारी. पण अशा अवचित प्रसंगातूनच विलक्षण अनुभव येतात. याची त्यांना कल्पना होती.

पस्तीस मैलाचं अंतर कापायला त्यांना एक तास लागला. माहूलगावाच्या बाहेरून ते खडीच्या रस्त्याला लागले. आणि दुरूनच जेजींना गणपत मिस्त्रीची मोटारसायकल दिसली. आणि मग एका दगडावर विडी पित बसलेला मिस्त्रीपण दिसला.

धूळ उडवत येणारी गाडी बघताच विडी पायाखाली दाबून तो घाईघाईनं उठला. तोपर्यंत गाडी त्याच्याजवळ येऊन थांबली होती.

संभाजीराव आणि जेजी खाली उतरले. मिस्त्रीनं संभाजीरावांना नमस्कार केला. खिशातून किल्ल्या काढण्यासाठी हात घातला. आणि तो वाड्याकडे जायला वळला.

"गणपत जरा थांब." संभाजीराव म्हणाले.

तो थांबला आणि मान वळवून त्यांच्याकडे बघू लागला.

"आधी काय झालंय ते मला सांग." ते म्हणाले.

"मालक, त्याचं काय झालं, तो धनगराचा पोरगा नाय का रामू, तो शेळ्या चारायला इथे आला होता, सकाळी. त्याला वाड्यातून काहीकाही आवाज ऐकाय आले."

"कसले आवाज..?"

"तो खूप घाबरला होता मालक, धड सांगत नव्हता. दारं खिडक्या आपटण्याचे आवाज म्हणत होता, वावटळ घुसली म्हणत होता, तोफा बंदुकाचा बार म्हणत होता, त्याचं बोलणं त्यालाच कळत नव्हतं बघा." गणपत म्हणाला.

"मग तू काय केलंस."

"काही नाही. तुम्हाला एसटीडीवरनं फोन केला."

"तू वाड्यात जाऊन बघितलं नाहीस..?"

"नाही बा. मी पण घाबरलो मालक, इकडं यायचीच भीती वाटली. मग तुम्हाला फोन केला."

"बरं चल, कुलूप उघड." संभाजीराव म्हणाले.

जेजी गाडीजवळ उभे राहून वाड्याकडे बघत होते.

आणि बघता बघता ते घडलं.

एक क्षणभरच, क्षणभरच मळभ आल्यासारखं अंधारून आलं. समोरच्या वाड्यावर ढगांची सावली पडली. हलणाऱ्या पाण्यावरच्या प्रतिबिंबासारखा वाडा हलला. हिंदकळल्यासारखा.

आणि पुन्हा सगळं पूर्ववत झालं. संध्याकाळच्या उतरत्या उन्हात वाडा उजळून निघालेला दिसत होता.

मग आपण पाहिलं ते काय होतं..? तो भास होता..? दृष्टीभ्रम..? की आणखी काही..? एखादा संकेत..? धोक्याची सूचना..?

वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची शरीराला जाणीव करून देतं. स्नायू ताठ होतात. अंगावर शहारा येतो. हृदयाची धडधड वाढते. डोळ्यासमोर अंधारी येते. आक्रमण किंवा प्रतिक्रमण, संघर्ष किंवा पलायन याची ती पूर्वतयारी असते. एका क्षणात निर्णय घ्यायचा असतो.

जेजींना हा अनुभव नवीन होता. आणि म्हणूनच त्यांना निर्णय घेता येत नव्हता. त्यांना पुढं जाता येत नव्हतं, आणि मागेही जाता येत नव्हतं. पुतळ्यासारखे ते स्तब्ध उभे राहिले होते.

"जेजी.."

संभाजीरावांच्या हाकेने ते भानावर आले.

"अं..!"

"येताय नं..?"

मन अजूनही धोक्याची सूचना देत होतं. आता मात्र त्यांनी निर्णय घेतला. तो सावधगिरीचा होता. थोडासा पलायनाचाच होता. किंवा सावरण्यासाठी त्यांना वेळ हवा होता काहीही म्हणा. ते म्हणाले.

"संभाजीराव, दाराला कुलूप आहे, म्हणजे जे कोणी आत शिरले असतील ते वेगळ्या मार्गानं आत गेले असणार. आपण आधी वाड्याला बाहेरून चक्कर मारली तर..?" संभाजीरावांनी थोडासा विचार केला, मग म्हणाले, "ठीक आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे." मग ते गणपतकडे वळून म्हणाले, "तू वाड्यात जा. आम्ही आलोच."

मग ते दोघं वाड्याच्या डाव्याबाजूनं जाऊ लागले.

वाड्याभोवती सगळं तण माजलं होतं. उन्हाळा अजून सुरु झाला नव्हता. पण गवतावर पिवळी छटा दिसू लागली होती. काही हिवराची आणि बाभळीची खुरटी झाडं इतस्ततः पसरली होती. बाकी सगळं माळरानाच होतं.

पायवाट नव्हतीच. तिथं कुणाचा वावरच नव्हता. असायचं काही कारणच नव्हतं. गवत तुडवत ते दोघं चालत होते.

वाड्याला चारही बाजूनं भक्कम तट होता. जमिनीपासूनच अनगढ दगडी तट अजूनही टिकून होता. पण त्यावरचं विटांचं बांधकाम मात्र चांगलंच ढासळलं होतं. काही ठिकाणी तर त्याला खिंडारं पडली होती. आणि त्यातून आतला तीन माजली वाडा उघडा पडला होता. चार फुटांचा दगडी तट चढून गेलं तर वाड्यात कुणालाही सहज प्रवेश करता आला असता. पण ते जरा अशक्यच होतं. कारण चढण्यासाठी तटाजवळ एकही उंच झाड नव्हतं. एखाद्यानं अगदी दोर वापरून चढायचं ठरवलं तर गोष्ट वेगळी.

वाड्याभोवती फिरताना संभाजीराव आणि जेजी खाली बघत चालले होते. त्यांना कुठंही माणसाचा हस्तक्षेप झाल्याच्या खुणा दिसत नव्हत्या. माहूलगावच्या परिसरात वाड्याविषयीचा प्रवाद सगळ्यांनाच माहीत होता. चोरांनी इतक्या वर्षात आत प्रवेश करण्याचे प्रयत्न केलेच असणार आणि त्यांना काही अनुभव आलेच असणार. असं असूनही वाड्यात शिरण्याची ही घटना घडली होती. याचा अर्थ तो नवखा होता. असे अनुनभवी चोर काहीतरी मागे पुरावा ठेवून जातात. विडीची थोटकं, गावठी मद्याची एखादी बाटली. पावलांचे ठसे, सायकलीच्या टायरचे ठसे.

पण दोघांना तर तसं काहीच दिसलं नाही. आणि तरीसुद्धा वाड्यात कुणीतरी शिरलं होतं हे नक्की.

जेजीच्या मनात एक शंका आली. खरंच कोणी बाहेरून आत शिरलं असेल का..? आतच कुणाचं तरी कायमचं वास्तव्य असलं तर..?

कदाचित हाच विचार संभाजीरावांच्या मनात आला असावा. कारण दोघांनी एकाचवेळेस वाड्याकडे बघितले. ते आता वाड्याच्या मागच्या बाजूला होते. तिथून त्यांना वाड्याचे वरचे दोन मजले स्पष्टपणे दिसत होते. दुसऱ्या मजल्याला तीन आणि तिसऱ्या मजल्याला दोन खिडक्या होत्या.

त्या सताड उघड्या होत्या.

जेजी गणपतबरोबर वाडा बघायला आले होते तेव्हा सगळ्या खिडक्या बंद होत्या हे त्यांना चांगलं आठवतं होतं.

याचाच अर्थ आतमधे कुणीतरी होतं. ते दोघं वाड्याकडे बघत होते. आणि एखाद्या अजस्त्र कोळ्यासारखा तो वाडा आपल्या पाच डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत होता.

तिसऱ्या मजल्यावरच्या डाव्याबाजूला खिडकीत एखादी सावली हलल्यासारखी झाली.

आत कोणीतरी वावरत होतं.

मग तीच सावली बाजूच्या खिडकीत हलल्यासारखी झाली.

तीच होती की शेजारच्या खोलीत आणखी कुणीतरी होतं..?

म्हणजे आत आहेत तरी किती जण..?

संभाजीराव आणि जेजी मान वर करून बघत असतानाच अचानक डाव्या खिडकीमधे एक चेहरा दिसला.

दोघंही दचकून मागे सरकले.

तो चेहरा सेकंदाच्या काही भागापुरताच दिसला आणि लगेच उजव्या बाजूच्या खिडकीत दिसला आणि क्षणात नाहीसा झाला.

तो चेहरा होता, पण त्यावरचा तपशील दोघांनाही सांगता आला नसता. कोणीतरी बाहेर डोकावून बघत होतं एवढं निश्चित.

संभाजीरावांनी विस्फारलेल्या डोळ्यांनी जेजींकडे मान वळवून बघितलं.

जेजीपण त्यांच्याकडेच बघत होते.

"मला जे दिसलं ते तुम्हालाही दिसलं..?" संभाजीरावांनी विचारलं.

जेजींनी होकारार्थी मान हलवली.

तेवढ्यात त्यांना मोटारसायकलचा आवाज आला. तो वेगानं दूर जात होता. दोघंही चालू लागले. त्यांनी आपला वेग वाढवला. त्यांच्या वयाच्या मनानं पळता येईल तेवढं ते पळू लागले.

वाड्याला वळसा घालून ते पुन्हा दिंडीदरवाज्यापाशी आले, तेव्हा दोघांनाही चांगलीच धाप लागली होती. छाती चांगलीच धडधडत होती. त्याचं शारीरिक कारणही होतं आणि मानसिक कारणही होतं.

गणपतची मोटारसायकल दिसत नव्हती.

आणि दाराला भलंमोठं कुलूप होतं.

हा वाडा बंद करून गेला कुठं..?

धाप कमी होण्यासाठी ते जवळच्याच एका लांबलचक शिळेवर बसले. गुडघ्यावर हाताची कोपरं ठेवून, मान खाली घालून ते मन स्थिरस्थावर होण्याची वाट पाहू लागले. दोघंही कदाचित एकच विचार करत असावेत.

गणपत दार उघडून आत गेला होता. आधी पहिल्या मग दुसऱ्या आणि मग तिसऱ्या मजल्यावर गेला असेल. त्याला कुणाची तरी चाहूल लागली असेल. घाबरून तो खाली आला असेल. संभाजीरावांचा, जेजींचा किंवा आणखी कोणाचाही विचार न करता त्यानं मोटारसायकल चालू करून इथून पळ काढला असावा.

किंवा अशीही एक शक्यता होती. आत जे कोणी असतील त्यांना बाहेर जाण्याची एक वाट बंद करून, म्हणजे दाराला कुलूप लावून, तो पोलिसांना कळवण्यासाठी गावात गेला असावा.

दुसरी शक्यता जास्त शक्यकोटीतली वाटत होती. गणपत घाबरून जाणाऱ्यांपैकी नव्हता. वाड्यातला तो अनुभव त्यानं अगदी तटस्थपणे सांगितल्याचं जेजींना आठवलं. शिवाय संभाजीरावांनी पारख करूनच त्याला कामाला ठेवलं असणार.

छे..! गणपत पळून जाणाऱ्यापैकी नक्कीच नाही.

संभाजीराव शिळेवरून उठले. त्यांनी कारचं दार उघडलं. आतून पाण्याची एक बाटली काढली. हाताची मूठ तोंडाजवळ धरून, मान मागे करून त्यांनी दोन घोट घेतले आणि बाटली जेजींकडे दिली.

जेजींनाही चांगलीच तहान लागली होती.

दोन घोट घेऊन बाटली पुन्हा संभाजीरावांकडे देत असतानाच दोघांनाही मोटारसायकलचा आवाज ऐकू आला.

दोघांनीही त्या दिशेने बघितले.

आधी धूळ दिसली, मग मोटारसायकलवरचा गणपत.

एक दोन मिनिटातच तो जवळ आला. गाडी स्टँडवर लावत असतानाच संभाजीरावांनी त्याला विचारलं, "कुठं गेला होतास..?"

ओशाळलेल्या स्वरात गणपत म्हणाला, "किल्ल्या आणायला.."

"म्हणजे..?"

"म्हणजे असं झालं मालक, गडबडीमधी चुकून मी दुसऱ्याच किल्ल्या खिशात घातल्या आन इथं आलो बघा. कुलूप उघडताना ध्यानात आलं. इचार केला, तुमी येईपर्यंत गाडीवर जाऊन किल्ल्या आणाव्या म्हणून गेलो होतो साहेब.."

त्याचे शब्द अगदी साधे होते. पण त्याचा परिणाम किती जबरदस्त होता.

गणपतनं वाडा उघडलाच नव्हता तर मग वाड्यात कोण होतं..? किडकीमधे जे दिसलं ते काय होतं..?

"ठीक आहे, आता लवकर उघड, आधीच उशीर झालाय.." संभाजीराव घोगऱ्या आवाजात म्हणाले.

गणपतने किल्ल्यांचा जुडगा काढला आणि दिंडी दरवाजाचं कुलूप उघडलं. दिंडीला हात लावताच ती आत गेली. गणपत, संभाजीराव आणि मग जेजी असे त्यातून आत गेले.

काही पावलं चालत फरसबंद अंगणात आले. वाड्याच्या मुख्य दाराच्या दिंडीलाही कुलूप तसंच होतं. गणपत ते उघडत असताना संभाजीराव आणि जेजी अस्वस्थपणे उभं राहून वाड्याचा कानोसा घेत होते. समोरचा तीन माजली वाडा शांत होता. स्मशानशांतता एक नेहमीची उपमा जेजींच्या मनात आली. पण ती स्मशान शांतता नव्हती. किंवा ती वादळापूर्वीची शांतताही नव्हती. मनावर दडपण येत होतं. विचारांची साखळी सारखी तुटत होती. कानांना डोळ्यांना जे प्रतीत होत होतं ते मेंदूपर्यंत जात नव्हतं, किंवा तो ग्रहण करत नव्हता.

गणपत पाठोपाठ दोघंही वाड्यात शिरले. दोन्ही बाजूच्या देवड्यामधला बोळ पार करून ते पुन्हा एका फरसबंद चौकात आले. दोन्ही बाजूंनी वर जायला जिने होते.

"मालक ते बघा.." गणपत म्हणाला.

दोघांनी त्याच्या हाताच्या बोटाच्या दिशेने वर बघितले.

दोन्ही मजल्याची सगळी दारं आणि खिडक्या सताड उघडी होती.

"गणपत, तुला मी नेहमी सांगत असतो, वाड्यातली सगळी दार बंद करत जा म्हणून. प्रत्येक दाराला कुलूप लावायला हवं."

"मालक, खंडोबाची आण घेऊन सांगतो, माजी कायबी चुकी नाही. मी सगळी दारं माझ्या हातांनी लावली होती. कुलूपं बी लावली होती. हवं तर या साहेबांना विचारा. तेच सोबत होते माझ्या." गणपत गयावया करून सांगत होता. थोडासा घाबरलाही होता. जेजी लगेच त्याची बाजू घेत म्हणाले, "संभाजीराव, तो म्हणतो ते खरं आहे. माझ्यासमोर त्यानं सगळ्या दारांना कुलूपं लावली होती आणि खिडक्याही बंद केल्या होत्या."

संभाजीरावांनी क्षणभर पुन्हा एकदा वर बघितलं आणि मग ते म्हणाले, "चला आपण वर जाऊ."

डाव्या बाजूच्या जिन्याची पहिली पायरी चढताना संभाजीरावांनी सहज उजव्या हातानं जिन्याच्या कठड्याचा आधार घेतला. आणि त्यांचा तोल गेला.

जेजींनी त्यांना सावरलं. पण तो कठडा मात्र संपूर्णपणे बाहेरच्या बाजूनं कलला आणि मोडून खाली पडला.

पण आता संभाजीराव थांबायला तयार नव्हते. ते पायऱ्या चढून वर गेले. त्यांच्या पाठोपाठ जेजी आणि गणपत.

पहिल्या मजल्यावरच्या प्रत्येक खोलीसमोर उभे राहून ते आत डोकावून बघत होते. कोणत्याही खोल्यांमधे कोणतेही सामान नव्हतेच. त्यामुळे ते चोरीला जाण्याची शक्यता नव्हतीच. पण खोल्या बघताना एक गोष्ट लक्षात येत होती. खोल्यांची दारं आतल्या बाजूला उघडली होती. खिडक्यांची दारं बाहेरच्या बाजूनं. एखाद्या वादळानं आत शिरून सगळी दार खिडक्या आपटून दाणादाण उडवल्यासारखं दिसत होतं.

पण वादळ आत शिरेलच कसं..? तसं असतं तर खिडक्यांची दारं मोडून आत पडली असती. इथं काही दारं आतल्या बाजूला आणि खिडक्या बाहेरच्या बाजूला मोडून पडल्या होत्या. नुसतं एवढंच नाही. कपाटाची दारं आत वाकली होती. नुसतं एवढंच नव्हतं.

खोलीमधल्या घडवंच्या, आसनं मेज सगळं कुणीतरी एकत्र करून किंवा सरकवून खोलीच्या मध्यावर आणून ठेवली होती. आणि पिरॅमिडसारखी रचून ठेवली होती. ते तिघे तिसऱ्या मजल्यावर गेले. तिथंही हीच परिस्थिती होती.

एकेक खोली ओलांडत ते त्या खोलीजवळ आले.

खोलीत शिरण्यापूर्वी तिघंही थबकले.

तिघांनाही या खोलीत वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा अनुभव आला होता.

जेजींना या खोलीच्या समोर येताच पायाखाली एकदम खोल काळी गर्ता उघडावी तसं वाटलं होतं. किंवा पाण्याचा एखादा प्रचंड लोट अंगावर येत असल्याची भावना.

गणपतला या तिसऱ्या मजल्यावर खाली यायची वाटच सापडत नव्हती. आणि रावते यांना याच खोलीत छताच्या कडीला दोरीनं टांगलेलं प्रेत दिसलं होतं, आणि ते त्यांच्याकडे मान वाळवून हसत होतं.

तिघांचे अनुभव वेगळे, पण परिणाम एकच.

या वास्तूमधे विचारांना दृश्यस्वरूप देण्याचा एक विलक्षण गुण होता यात काहीच शंका नाही. जेजी विचार करत होते. त्यांच्या मनात हळूहळू एक योजना तयार होत होती.

संभाजीरावांनी कसलाही विचार न करता त्या खोलीत पाऊल टाकलं. पाठोपाठ जेजी आणि मिस्त्री.

आणि तिघंही दारापाशीच थांबले. त्यांना खोलीत एक विलक्षण दृश्य दिसलं.

खोलीतलं सगळं सामान कुणीतरी मध्यावर आणून ठेवलं होतं. सागवानी खुर्च्या, मेज टेबल, उंच स्टूल, चौरंग, एका मोठ्या पलंगावर पिरॅमिडसारखं मांडून ठेवलं होतं. आणि त्यावर चित्रांच्या सोनेरी चौकटी.

संभाजीराव त्या पिरॅमिडजवळ गेले. त्यावरची सगळ्यात वरची चौकट त्यांनी दोन्ही हातांनी उचलली. उलट होती ती सुलट केली.

तो पर्यंत जेजी त्यांच्याजवळ आले होते. त्या चौकटीमधे एक पोर्ट्रेट होतं. कुणा पेशवाईतल्या सरदाराचं फिकट निळ्या रंगाचा किनखापी अंगरखा. गळ्यामधे मोत्याची बोरमाळ. कानामधे सोन्याचे कुंडल. आणि डोक्यावर जरीपटका.

आणि तो चेहरा भव्य कपाळ, धारदार नाक, जाड ओठ, आणि डोळे. ते तर किती विलक्षण. त्यामधे एक पाशवी दहशत होती, वासना, लालसा, छद्मीपणा, उद्धटपणा, मग्रुरी या सगळ्यांचं मिश्रण त्यामधे होतं.

ज्या कुणा चित्रकारानं ते पोर्ट्रेट चितारलं होतं तो अगदी नवखा होता. रंगरेषा सफाईच्या नव्हत्या. कदाचित चेहरासुद्धा जसाच्या तसा चितारता आला नसेल त्याला. परंतु त्याचं सगळं कसब त्या डोळ्यात होतं. सगळं कौशल्य वापरून त्यानं ते डोळे रंगवले होते. ते इतके परिणामकारक होते कि दोनशे अडीचशे वर्षांच्या कालावधीनंतरही त्यातला जिवंतपणा अजूनही तसाच होता. पोर्ट्रेट बघणारा नजरेला नजर देऊ शकत नव्हता.

दोन्ही हातात चित्राची चौकट धरून संभाजीराव एकटक त्या चित्राकडे बघत होते. मग ते म्हणाले, "जेजी हाच तो चेहरा. याच खोलीत मला दोरीला लटकलेलं प्रेत दिसलं होतं ना, त्याचा चेहरा अगदी असाच होता."

क्रमशः...

(तळटीप: - ग्रुपवरील अ‍ॅडमीनच्या पूर्वपरवानगी शिवाय ही कथा इतर कुठेही पोस्ट करण्यास सक्त मनाई आहे.)

भाग ०५                                                           भाग ०७

Thursday 25 January 2018

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~ भाग ०५

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~ 
मूळ लेखक - नारायण धारप आणि डॉ. अरुण मांडे

भाग ०५

तशा त्यांच्या टिपणवहीत नोंदी खूप होत्या - काही परगावच्या काही वेगळ्या राज्यातल्या, काही तर परदेशातल्या, आताच्या क्षणी जेजींना फक्त स्थानिक घटनात स्वारस्य होतं. त्या घटनात गुंतलेल्या लोकांशी संपर्क साधणं सोपं होतं - शिवाय त्यांच्या पुढच्या एका नावापाशी जेजी थांबले.

पारू धोंडिबा म्हातरे.

ही नोंद काही टीव्ही, वर्तमानपत्रं यातील बातम्यांवरून केलेली नव्हती - तर त्यांचे एक मित्र देशपांडे यांच्याकडून त्यांना ती माहिती मिळाली होती. एव्हाना जेजींच्या मर्यादित मित्रपरिवारात त्यांच्या छंदाची सर्वांना माहिती होती. तेव्हा देशपांड्यांचा फोन ही काही फार मोठी अनपेक्षित गोष्ट नव्हती.

"जेजी, वेळ आहे ना - मग एक तर -"

अशी सुरुवात करून देशपांड्यांनी पारूची हकीकत सांगितली होती. पारूचं वय सात-आठ वर्षांचं होतं. तिची आई रखमा देशपांड्यांच्या घरचं काम करीत असे. ती संध्याकाळची घाईघाईने देशपांड्याकडे आली. गेले दोन दिवस पारूला ताप येत होता. पण आता ताप एकदम एकशेपाचच्या वर गेला होता. आणि पारूची शुद्ध हरपली होती. देशपांड्यांनी आपल्या एका निकट स्नेही डॉक्टरांना फोन केला आणि रखमाला पारूला त्यांच्याकडे न्यायला सांगितलं. जेजी, ताबडतोब हालचाली झाल्या म्हणून पारू वाचली - आणखी काहीवेळ गेला असता तर तिची काही धडगत नव्हती. पण योग्य वेळी योग्य ते उपचार झाले आणि तिच्या जीवाचा धोका टळला. चार दिवसांनी तिला त्यांनी घरी आणलं. अगदी खूपच अशक्त झाली होती. मग घरातल्या घरात हिंडायफिरायला लागली होती. जेजी, आता नीट एका हं - एका संध्याकाळी पारुत अगदी विलक्षण विश्वासच न बसण्यासारखा बदल झाला. आता आताशी ती जेमतेम चतकोर भाकरी खायला लागली होती. पण त्या संध्याकाळी काहीतरी भलतंच घडलं होतं. पारुने पानातला भाकरीचा चतकोर तर संपवलाच - "आई, आणखी घाल ना..!" म्हणाली. बिचारी रखमा..! तिला पोर सुधारते आहे याचा केवढा आनंद झाला. तिने पारूच्या पानात आणखी चतकोर वाढला - तोही पारुने पाहता पाहता फस्त केला - आणि मग तर गोष्ट भलत्याच थराला गेल्या. पारूची एक पुरी भाकरी खाऊन झाली तरी ती आणखी मागतच होती. काही केल्या ऐकेना. रखमाला काही हे लक्षण चांगलं दिसलं नाही - पण ती नाही म्हणताच पारुने मोठ्याने भोकाडच पसरलं - "मला भूक लागलीय, आणखी वाढ ना..!" तिचा आपला घोषा सुरूच. शेवटी दोन सबंध भाकऱ्या खाल्ल्या तेव्हाच पारूची भूक शांत झाली. पण हा काही अपवाद नव्हता - प्रत्येक जेवणाच्या वेळी हाच तमाशा. सकाळ संध्याकाळ ही आठ वर्षांची पोर दोन दोन भाकऱ्या खायला लागली.

"जेजी मोठी चमत्कारिक वाटते नाही कां ही हकीकत..? पण हे तर काहीच नाही. आणखी विलक्षण गोष्ट ऐकायची तयारी ठेवा - तर मग ही रखमा बिचारी अगदी घायकुतीला आली होती. तेव्हा मी तिला पुन्हा एकदा पारूला घेऊन डॉक्टरांकडे जायला सांगितलं आणि एकदोन दिवसातच मला डॉक्टरांचा फोन आला "देशपांडे, ही तुमची पारूची केस मोठी विलक्षण आहे हो..!" ते म्हणत होते. "विलक्षण म्हणजे काय..?" मी त्यांना विचारलं. "अहो देशपांडे तिच्या वागण्याचं काही स्पष्टीकरण होत नाही हो - एकदा येऊन भेटता का..? मग प्रत्यक्षच बोलू -"

"जेजी, मी डॉक्टरांच्याकडे गेलो. पारूच्या घरची परिस्थिती काही तिला स्पेशल रुममधे ठेवण्यासारखी नव्हती - पण डॉक्टरांनी तिला एका स्पेशल रुममधे ठेवलं होतं. मी तिथे पोहोचताच ते म्हणाले, "देशपांडे, एकदा या पारूला पाहून घ्या मग आपण बोलू.." आम्ही खोलीत गेलो. पारू खाटेवर झोपली होती. आठनऊ वर्षांची नुकतीच आजारातून उठलेली मुलगी शरीर खंगलेलंच होतं. खाटेशेजारी तिची आई बसली होती. आम्हाला पाहताच ती उठायला लागली. डॉक्टरांनीच तिला बसून राहण्याची खूण केली. आम्ही दोघं खाटेशेजारी चारपाच मिनिटं उभे राहून पारूकडे पाहत होतो. ती अगदी शांत झोपली होती. मग खूण करून डॉक्टरांनी मला त्यांच्या केबिनमधे आणलं. "देशपांडे पाहिलंत ना, आज तिचा तिसरा दिवस आहे. घरची माणसं डबा आणतात - डबा पाहिलात तर तुमचा विश्वास बसणार नाही की हा डबा एका आठनऊ वर्षांच्या आजारी मुलीसाठीचा आहे. अहो, चांगल्या जाड जाड दोन भाकरी, झणझणीत मसालेदार भाजी आणि चटणी. आणि ही पारू ते सगळं एका खेपेत संपवते. मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं नसतं तर माझा विश्वास बसला नसता. आणि परत संध्याकाळी तोच प्रकार. तिच्या वजनात एका ग्रॅमनेही वाढ झालेली नाही. बरं एवढं खाते तर काही अपचन झालं आहे, पोट बिघडलं आहे असाही काही प्रकार नाही. सगळ्या शारीरिक तपासण्या केल्या - थोडासा ऍनिमिया आहे - या पारूला इथं कशासाठी ठेवून घ्यायची..? मी तिला काय ट्रीटमेंट देतो आहे..? काही नाही. केस विलक्षण आहे - पण माझ्या अवाक्यापलीकडची आहे." "पण डॉक्टर एखादा स्पेशालिस्ट..?" मी विचारलं. तर ते म्हणाले, "कोणत्या फिल्डमधला स्पेशालिस्ट..? सांगा की. नाही मी तर तिला सरळ घरी पाठवणार आहे. मग खरोखरच त्यांनी तिला दुसऱ्या दिवशी घरी पाठवून दिली."

"मग..?" जेजींचं कुतूहल अर्थात जागं झालं होतं.

"जेजी, डॉक्टर मला एवढं मात्र म्हणाले - देशपांडे, मला हि साधी केस वाटत नाही. शारीरिक तक्रार बिघाड काहीही नाही - मला वाटायला लागलं आहे या पारूच्या मनावरच काहीतरी परिणाम झाला असावा. पण ते क्षेत्र माझं नाही. तिला एखाद्या सायकोथेरपिस्टकडे किंवा एखाद्या सायकियाट्रिस्टकडे न्यावं लागेल आणि या लोकांना ते कसं परवडणार..? तेव्हा तसला व्यावहारिक सल्ला देण्याची चूक मी करणार नाही."

"मग..?" जेजींनी विचारलं.

"मग काय, ती पारू घरी आहे."

"आणि ते खाण्याचं - ते अजूनही -"

"अगदी तसंच जरा जास्तच. आता तर कधी कधी ती घरातली कच्ची भाजीही खाते. घरचे काय करणार बिचारे. मुकाटपणाने जे काय चाललं आहे ते पाहात राहतात आणि आपल्या कर्माला दोष देतात."

"देशपांडे, मला एकदा त्या पारूला भेटता येईल का..?"

"का नाही..? केव्हाही - पण जेजी, तुमचा विचार काय आहे..?"

"मनात एक कल्पना आहे- जरा स्पष्ट झाली की तुम्हाला सांगेनच - पण भेट केव्हा ठरवता..?"

केव्हाही. अगदी उद्याही. ती रखमा माझ्याकडेच कामाला आहे ना. तिला सांगितलं की ती पारूला बरोबर आणेल."

"मग उद्या सकाळी..? नऊ साडेनऊच्या सुमारास..?"

"अगदी नक्की. या तुम्ही नऊ वाजता..."

~~~~~~~~~

अपारंपरिक घटनांचा अभ्यास - निदान नोंद - हेच जेजींचे साध्य होतं. त्यामुळे अर्थात ऍबनॉर्मल सायकॉलॉजी, फोबियाशी, सायकोसिसशी संबंधित घटना त्यांच्या निरीक्षणाच्या परिघात येणार. आणि मानसशास्त्र म्हटलं की हिप्नॉटिझम - संमोहनशास्त्र हेही आलंच. दोन शतके सर्वसामान्य माणसाला ज्ञात झालेली - पण मानवी इतिहासात गुप्तपणे वापरली गेलेली - ही ज्ञानाची शाखा. तिचं अस्तित्व तर नाकारता येत नव्हतंच, पण तिचं समर्पक स्पष्टीकरणही करता येत नव्हतं. हिप्नॉटिझम करणारा आणि हिप्नोटाईज होणारा यांच्यात काही घटक आवश्यक होते का..? काही खास लोकांनाच ही विद्या आत्मसात करता येत होती का..? त्याला काही विशिष्ट प्रकारचा स्वभाव म्हणा, सराव म्हणा, अभ्यास म्हणा, हे काही आवश्यक होतं का..? की ती एक निसर्गदत्त देणगीच होती..? अर्थात जेजींनी त्या विषयाची अनेक पुस्तकं वाचली - आणि त्यांच्या स्वभावास अनुसरून - जमले तसे, जमले तेव्हा प्रयोगही केले. काही वेळा त्यांना यश आलं, काही वेळा ते अपयशी झाले. पण आपल्या शास्त्रांच्या भात्यात आणखी एक बाण जमा झाल्याचं समाधानही लाभलं.

आता एकाएकी त्यांच्या मनात विचार आला, या पारुवर आपण हा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे..? तिला धोका तर काही नव्हता - निदान प्रसंगातली एखादी बाजू अंधारात असेल तर तीही प्रकाशात येईल. मुख्य म्हणजे ज्ञानार्जन याखेरीज त्यांच्या मनात इतर कोणताही हेतू नव्हता.

~~~~~~~~~

बरोबर नऊ वाजता जेजी देशपांड्यांच्या ब्लॉकवर हजर झाले. "या या जेजी," देशपांडे हसत म्हणाले, "या.." दोघं हॉलमध्ये बसले होते.

"काय आली आहे ती पारू..?" जेजींनी विचारलं.

"हो आली आहे - बोलावतोच तिला - पण आधी एखादा कप चहा..?"

"हरकत नाही..." जेजी म्हणाले. चहाचा ट्रे न्यायला रखमा खोलीत आली तेव्हा देशपांडे तिला म्हणाले, "रखमा, पारूला जरा बाहेर पाठवून दे - हे डॉक्टर आहेत - तिला पाहायला आले आहेत - पण तिला सांगू नकोस - नुसती बाहेर पाठव.."

तीनचार मिनिटांत पारू हॉलमधे आली. नऊ वर्ष वयाच्या मानाने शरीराने जरा किरकोळच, रंग खूपच सावळा, पण चेहरा तरतरीत, दोघांकडे आलटून पालटून पाहात ती उभी होती. "बस पारू.." जेजी म्हणाले. ती खुर्चीच्या अगदी कडेवर बसली. खिशातून एक चॉकलेटचा बार काढून जेजींनी तो तिच्याकडे दिला. "आवडतं ना चॉकलेट..?" वडी पाहताच तिचा चेहरा खुलला होता पण बुजून ती जागच्याजागीच बसून होती. "घे घे ना..!" जेजी म्हणाले. एकदा देशपांड्यांकडे पाहून ती पुढे झाली आणि तिनं चॉकलेटचा बार हातात घेतला. "बस जा खुर्चीवर आणि आताच खाल्ला तरी चालेल." जेजी म्हणाले, "नीट आरामात बस. मी तुला काही काही विचारणार आहे. ठीक आहे..? खाता खाता बोललीस तरी चालेल. तर मग - तुला आठवतं का की तुला डॉक्टरांनी काही दिवस हॉस्पिटलमधे ठेवलं होतं..?"

"हो आठवतं.."

"डॉक्टरांनी काही इंजेक्शन दिली का..?"

"नाही.."

"काही कडू औषधं दिली का..?"

"नाही.."

"मग घरी पाठवून दिलं.."

"हो.."

"छान, आता मी आणखी काही विचारणार आहे - पण अशी आखडून बसू नकोस - आरामात बस. मागे सरक - पाठ मागे टेकव - मान मागे टेकव - हात खुर्चीच्या हातावर ठेव - छान. विचारतो त्याची सरळ उत्तरं द्यायची काय..? छान. आधी एक सांग - तुला कितीपर्यंत आकडे मोजता येतात..?"

"शंभर पर्यंत.."

"छान छान, लाग बरं एकापासून मोजायला..."

पारू घाईघाईने एक दोन तीन चार असे अंक मोजायला लागली.

"थांब थांब इतकी घाई करायची नाही - सावकाश मोजायचे - म्हणजे एक... दोन... तीन... असे - "

"एक... दोन... तीन..."

"पारू, मागे तुकवून आरामात बस ना..! डोळे मिटलेस तरी चालेल - अस्सं -"

जरा वेळाने जेजी म्हणाले - बघ - हात जड होताहेत ना..? झोप आल्यासारखी वाटते ना..? मग झोपलीस तरी चालेल - खुशाल झोप -"

पारूचे शब्द अडखळत यायला लागले. आणि सातपाशी थांबले.

"पारू..!" जेजी पुढे वाकून म्हणाले, "ऐकू येतं का..?"

"हो.."

"समजतं का मी बोलतो आहे ते..?"

"हो.."

"मग आता तू झोपणार आहेस - पण मी पारू, एक दोन तीन म्हणताच तुला जाग येणार आहे. समजलं..? एक दोन तीन म्हणताच..! समजलं..?"

"हो.."

"पारू.." जेजी जरा गंभीर आवाजात म्हणाले, "आता पहा हं - रोज संध्याकाळची तू घरी एकटी असतेस तेव्हा घराच्या दारात बसतेस..?"

"हो,"

"काय करतेस..?"

"चाळीच्या अंगणात मुलं खेळत असतात ते पाहते.."

"पण मुलं नसतील तर..?"

"अंगणात पिंपळाचं मोठं झाड आहे - कधी कधी अगदी वरच्या पानावर ऊन पडलेलं असतं - ती पण कशी चकचक करतात, ते पाहात बसते - "

"तशीच त्या संध्याकाळी बसली होतीस तेव्हा काहीतरी झालं - हो ना..?"

"हो.."

"काय झालं.."

"झाडाच्या फांदीवर हुप्प्या माकडासारखं काहीतरी बसलेलं होतं - मग ते एकदम खाली उतरलं आणि माझ्या जवळून घरात गेलं - मी किती भ्यायले..!"

"मग..?"

पण पारूचं काहीच उत्तर आलं नाही. ती नुसती डोळे मिटून बसून होती.

"पारू..? सांग - मग काय झालं..?" जेजींचा आवाज कठीण झाला होता.

दोन तीन सेकंदातच पारूचे डोळे खाडकन उघडले. डोळे इतके विस्फारलेले होते की त्यांच्यात बुबळेमधे तरंगताना दिसत होती. तिचा चेहराही बदलत होता. कपाळावर आठ्या आल्या होत्या. आणि तोंड हळूहळू उघडले - चेहऱ्यावर लाली आली होती - आणि चेहऱ्यावर जे हास्य होतं ते इतकं विलक्षण होतं की शरीरावर काटाच यावा आणि मग ती बोलली - पण आवाज आला तो नऊ वर्षांच्या मुलीचा नव्हता तर पुरुषी होता. राकट होता, उद्दाम होता.

"तिला कशाला विचारतोस..? ती काही सांगणार नाही, मला विचार की.." आयुष्यात जेजींनी इतका शीघ्र विचार कधी केला नव्हता - एका क्षणात त्यांच्या लक्षात आलं - प्रकरण आपल्या हाताबाहेर जात आहे. आपण काही यातले तज्ज्ञ नाही - हा प्रांत आपला नाही, एखादं प्रवेश बंद दार उघडून आत जावं तसं त्यांना वाटलं. हा अवकाश अपरिचित होता. कदाचित धोक्याचंही असेल - इथे काहीही होऊ शकतं. नाही हे दार तात्काळ बंद करायला हवं..!

एवढ्या विचाराला त्यांना सेकंदभरही अवधी लागला नसेल.

"आता का रे दातखिळी बसली..?" तो भसाडा आवाज लहानशा पारूच्या तोंडून येत होता. "तिला तावातावाने विचारत होतास ना..? मग मी सांगतो. ऐक मी झुंगू आहे. वडपिंपळाच्या झाडावर वस्ती करून असतो - पण कधीकधी असं नवीन झाड मिळतं." स्वतःच्या दोन्ही खांद्यांवर पारुने हात थोपटले. "पाहिलंस ना..? पिंपळाचं नवीन झाड सोडून मी हे नवीन झाड धरलं आहे - तिला जन्मभर सोडणार नाही. आता ती लहान आहे. दोन भाकऱ्यावर मी सध्या भागवतो आहे - पण तिला जरा मोठी होऊ दे - मग पहा कशी -"

इथपर्यंतचा भाग मा. श्री. नारायण धारप यांनी लिहिला होता. कादंबरीचा या पुढील भाग डॉ. अरुण मांडे यांनी पूर्ण केला आहे...

~~~~~~~~~

नवल नाही जेजी थोडेसे घाबरलेच होते. त्यांच्या कपाळावर घाम आला होता. हातांनीच पुसताना ते विचार करत होते. हे लवकरात लवकर थांबायला हवं होतं.

"तू जा आता," ते म्हणाले.

"मी जाईन नाही तर नाही जाणार. माझी मर्जी," झुंगू म्हणाला.

"तू आता जा.." जेजी पुन्हा म्हणाले.

त्यांना आता पारूची काळजी पडली होती. त्यांनी आपल्या जबाबदारीवर तिला इथं आणलं होतं. तिला संमोहनावस्थेत त्यांनी नेलं होतं खरं, पण आता जर ती पूर्वपदावर आली नाही तर..?

"झुंगू.." त्यांनी हाक मारली.

पारूकडून उत्तर आलं नाही.

"झुंगू.." त्यांनी पुन्हा हाक मारली.

पारू गप्पच होती. तिनं डोळे मिटून घेतले होते.

"एक दोन तीन.." जेजी म्हणाले, त्यांच्या आवाजात निकड होती. अधिरपणा होता. अस्वस्थपणा होता. ते एकटक पारूकडे बघत होते.

आणि पारुने खाडकन डोळे उघडले. आणि ती म्हणाली, "अठ्ठयाणव नव्याणव शंभर..." "शाब्बास.." जेजी म्हणाले. त्यांनी समाधानाचा एक सुस्कारा टाकला.

पारुने हातातल्या चॉकलेटकडे एकदा बघितलं आणि विचारलं, "मी खाऊ का..?"

"खा, खा नं..!" जेजी म्हणाले.

पारुने शांतपणे चघळत चघळत चॉकलेट संपवलं. तिला आणखी एक हवं होतं. पण पुन्हा मिळेल अशी शक्यता वाटेना. म्हणून तिनं विचारलं, "मी आता जाऊ..?"

"जा, जा नं..."

देशपांडे हा सगळा प्रकार बघत होते. त्यांनी लगेच रखमाला बोलावलं आणि पारूला न्यायला सांगितलं.

त्या दोघी आत गेल्यावर देशपांडे म्हणाले, "जेजी.."

"देशपांडे काही बोलू नका. जे झालं ते तुमच्यासमोरच झालंय. या पारूनं मला कोड्यात टाकलंय. तिला मी संमोहनावस्थेत नेण्याचा हेतू वेगळा होता. तिला सारखं सारखं खाण्याची जी सवय लागलीय ना -"

"रखमा त्याला भस्म्या रोग म्हणते..." देशपांडे म्हणाले.

"भस्म्या, चांगला शब्द आहे आणि अगदी योग्य आहे. पण तो रोग आहे की नाही माहीत नाही आणि असला तर त्याचं कारण शोधणं आवश्यक आहे. डॉक्टरांनी तर आधीच सांगितलंय त्यांना याचं कारण काही सापडत नाही म्हणून. हे असे रोग बहुधा मानसिक असतात. अनोरेक्झिआ नव्र्होझा नावाचा एक मानसिक रोग आहे. तरुणींमधे या रोगाचं प्रमाण जास्त आहे. अतिशय नैराश्य आलेल्या व्यक्तीला हा रोग होतो. तिची अन्नावरची वासना उडते. कित्येक दिवस ती अन्नपाणी वर्ज्य करते. आणि वेळीच इलाज केला नाही तर ती अक्षरशः खंगून खंगून मरते. देशपांडे, लठ्ठपणा हासुद्धा एक मानसिक रोग आहे. मनामधे असुरक्षिततेची भावना असलेल्या व्यक्तीला हा रोग होतो. अडीअडचणीला कामाला येईल म्हणून आपण जसा पैसा जमवून ठेवतो, तसं ही व्यक्ती चरबी साठवून ठेवते. पण देशपांडे, या पारूनं मला चांगलंच गोंधळात टाकलंय. या सात आठ वर्षांच्या पोरीला असुरक्षितता कशाची वाटत असेल बरे..? आणि तसं म्हणावं तर तिचं वजनही वाढत नाही. इतकं खाऊनसुद्धा ती आहे तशीच आहे. तिचं मानसिक कारण काहीतरी वेगळंच असावं आणि ते शोधून काढण्यासाठी म्हणूनच मी तिला संमोहनावस्थेत नेण्याचं ठरवलं होतं. पण जे झालं घडलं ते भलतंच. अगदीच विलक्षण, अनपेक्षित, अविश्वसनीय. अंगात आलेल्या बायका पुरुषी आवाजात परक्या बाषेत बोलतात, काही तर अस्खलित इंग्रजीत बोलतात हे मला माहीत आहे. पारूच्या तर अंगातही आलं नव्हतं. तिला मी संमोहनावस्थेत नेलं होतं. आणि तरीही -"

"ती नाटक तर करत नसेल ना..?" देशपांडे म्हणाले.

"नाही देशपांडे, तिला नाटक करण्याचं कारणच काय..? घरामधे दुर्लक्षित व्यक्ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अंगात येण्याचं नाटक करतात. त्याला मॅलिंगरिंग म्हणतात. पारूला तशी गरजच नाही. रखमाला तिची काळजी आहे हे आपण पाहतोच आहोत की. आणखी बरीच कारणे आहेत. हिस्टेरिया, मॅनिया. पण यातलं कोणतंच कारण पारूला लागू पडत नाही. अंगात आलेली व्यक्ती निरर्थक बडबड करते, तिला ग्रासोलोलिया म्हणतात. पण पारूचं बोलणं निरर्थक वाटत नव्हतं. खरं होतं, नाही देशपांडे, ते नाटक नव्हतं. तो झुंगू अगदी खरा वाटत होता."

"म्हणजे तिला भुतानं पछाडलंय असं म्हणायचं आहे का तुम्हाला..?"

"मी काही यातला तज्ज्ञ नाही. पण याविषयात रस नक्कीच आहे. कोणत्याही अपारंपरिक घटनांचा अभ्यास करणे, त्यांच्या नोंदी ठेवणे हाच तर माझा छंद आहे."

"पण आता या पारूचं काय करायचं..?" देशपांड्यांनी विचारलं.

"तिला एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जायला हवं. तिला लागणार खर्च हवं तर मी करीन. पण देशपांडे, पारूचा मला पुन्हा एकदा अभ्यास करायला हवा. मला जर गरज पडली तर तिला पुन्हा आणता येईल..?" जेजी म्हणाले,

"हो.. हो.. त्यात काही अवघड नाही. रखमा माझ्याकडेच काम करते.. तुम्ही केव्हाही सांगा.."

~~~~~~~~~

क्रमशः...

(तळटीप: - ग्रुपवरील अ‍ॅडमीनच्या पूर्वपरवानगी शिवाय ही कथा इतर कुठेही पोस्ट करण्यास सक्त मनाई आहे.)

भाग ०४                                                        भाग ०६

Wednesday 24 January 2018

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~ भाग ०४

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~
मूळ लेखक - नारायण धारप आणि डॉ. अरुण मांडे 
भाग ०४

संभाजीराव बोलायचे थांबले. ते खाली पहात टेबलावर बोटांनी टकटक आवाज करत होते. जेजींच्या ध्यानात आलं - वेळ मोठा बांका होता. अधिकउणा एक शब्दही मुलाखतीचा बेरंग करू शकला असता. पण मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मनात जो विषय सतत घोळत असतो, त्याचं सूतोवाच करायला आपोआपच त्यांच्यासमोर एक नामी संधी चालून आली होती. खुर्चीवर जरा पुढे वाकून जेजी म्हणाले, "संभाजीराव, तुम्हाला दिसलेल्या दृश्याचा आपण दोन दिशांनी विचार करू शकतो. ज्या अर्थी गणपतला - आणि अर्थात नंतर तुम्हालाही - त्या खोलीत दिसलं नाही त्या अर्थी त्या दृश्यास सत्यसृष्टीतलं कोणतंही परिणाम नव्हतं - याचा अर्थ ते दृश्य एका अर्थी असत्य होतं. तुमच्यापुरती साकार झालेली एक प्रतिमा होती - पण एखाद्या घटनेला केवळ असं एखादं लेव्हल लावून त्या घटनेचं स्पष्टीकरण होत नाही. समजा तुम्हाला भास झाला - पण तो का झाला..? आणि तुम्हाला त्यात असं शोकांत, जरा भयानक असं दृश्य का दिसलं..? संभाजीराव, गेली कितीतरी वर्ष मी या घटनांचा अभ्यास करीत आहे आणि माझ्यापुरती मी एक उपपत्ती निर्माण केली आहे."

एक हात वर करून संभाजीरावांनी जेजींना मधेच थांबवलंच. जेजींना वाटायला लागलं आपण या संभाजीरावांच्या अगत्याचा गैरफायदा घेत आहे. आवाज जरा खाली आणून जेजी म्हणाले, "संभाजीराव माझ्या ध्यानातच राहिलं नाही, की तुमचा वेळ अतिशय मोलाचा आहे - मी आपली व्याख्यानबाजीचं करीत राहिलो -"

जरासे हसत संभाजीराव म्हणाले, "डॉक्टर, एवीतेवी आपण एकमेकांशी प्रामाणिक राहायचं ठरवलंच आहे - तेव्हा ऐका - अहो, कसला महत्वाचा वेळ..? मला अशी काय मोठी कामं असतात..? हे ऑफिस म्हणजे नाटकातला एक देखावा आहे. बाकी काही नाही. वडिलोपार्जित गडगंज संपत्ती हाताशी आहे - कुशल आणि प्रामाणिक सल्लागारांच्या मदतीने मी तिची राखण तर केलीच आहे - त्यात थोडीफार भरही घातली आहे. डॉक्टर, तुम्हाला कल्पना नाही, मला भेटायला येणाऱ्यांपैकी पंच्याण्णव टक्के लोक मनाशी काहीतरी उद्देश ठेवून येतात. पैसे आहेत ना, मग कोण कोण तिकडे आकर्षित होईल काय सांगता येणार..? तुमच्याशी मी ज्या मोकळेपणाने बोललो तितका कितीतरी दिवसात कोणाशीही अगदी कुटुंबातल्या व्यक्तीशीही बोललो नाही. मला काहीही काम नाही. हवा तेवढा वेळ आहे. तुम्हाला थांबवलं ते एवढ्यासाठी की आपली एक कॉफी होऊन जाऊ दे. मग आपल्याला हवा तेवढा वेळ आहे. ठीक आहे..?"

जेजींनी हसत मानेनेच होकार दिला.

कॉफीचे मग हलवले गेल्यानंतर जेजी म्हणाले, "संभाजीराव, जरा विषयांतर करून बोलतो. सुरुवातीस माझे शब्द तांत्रिक क्लिष्ट वाटतील, पण जरा दमाने घ्या. रोजचं उदाहरण घेतो. आपण हातावर हात चोळले की हात गरम होतात, उष्णता निर्माण होते. कुठून आली ही उष्णता..? हातांच्या गतीमुळे निर्माण झाली. म्हणजेच घर्षणाने निर्माण झाली. हातावर हात घासण्याची शक्ती ही यांत्रिक शक्ती. तिचं उष्णतेच्या शक्तीत रूपांतर झालं. जगात हे शक्तीचं रूपांतर सर्वत्र, सदासर्वकाळ चाललेलं आहे. वाहत्या पाण्याच्या शक्तीतून विद्द्युतशक्ती निर्माण होते. विद्द्युतशक्तीतून उष्णता आणि शेवटी प्रकाश निर्माण होतो. थोडक्यात एक प्रकारची ऊर्जा दुसऱ्या प्रकारात रूपांतरित होते."

"संभाजीराव, आता आपण आपल्या मनाचा विचार करू. मनात विचार येत असतात. हाही मानसशक्तीचाच एक सौम्य अविष्कार आहे. जेव्हा माणूस काही ना काही कारणाने संतप्त होतो, उद्दीपित होतो, तेव्हा त्याच्या मानसशक्तीची मात्रा खूपच वाढलेली असते. आता यात माझ्या मनातील कल्पना सांगतो. काही काही जागा, परिसर, अवकाश, वास्तू अशा असतात की त्यांच्यात या मानसशक्तीचं रूपांतर दृश्य वा श्राव्य वा स्पर्श रूपात करण्याची क्षमता असते. एकदा हा साधा विचार स्वीकारला की अनेक गोष्टीचं स्पष्टीकरण करता येऊ शकेल. आता तुम्हालाच आलेल्या अनुभवाचं उदाहरण घेऊया. त्या आधी आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवायला हवी. आपल्या मनाचे सर्वच व्यापार आपल्याला ज्ञात नसतात. काही काही जाणिवेच्याही खालच्या, अव्यक्त पातळीवर चाललेले असतात. आपल्याला ते ज्ञात नसतात, पण त्यांची सत्यता नाकारता येत नाही. या अव्यक्त, अनकॉन्शस विचारांचे विलक्षण परिणाम झालेले दिसतात. त्या मानसशास्त्राशी आपल्याला याक्षणी काही कर्तव्य नाही. अव्यक्त पातळीवरच्या विचारांची सत्यता स्वीकारली की मग घटनांचं स्पष्टीकरण अधिक सुलभपणे होऊ शकतं."

"तेव्हा तुम्हाला आलेला अनुभव. खोलीत कोणीतरी एका अभागी माणसाने आत्महत्या केली होती. जरा खाजगीतील गोष्ट आहे - पण रागावू नका. रावते सरदारांच्या इतिहासात असे प्रकार झालेले आहेत, हो की नाही..? त्या वाड्यात वावरताना कळत नकळत तुमच्या मनात मागच्या या शोकांत घटनेचा काही ना काही विचार चाललेला असणारच पण या वस्तूचा विलक्षण गुणधर्म हा आहे की या अवकाशात मनातल्या विचारांना एक दृश्य स्वरूप येऊ शकतं. तुम्हाला आलेल्या अनुभवाचं माझ्यापुरतं मी केलेलं हे स्पष्टीकरण आहे. अर्थात हे परिपूर्ण नाही. समोर दृश्य झालेला आकार मायावी, भ्रामक, निरुपद्रवी असतो का त्याच्यामधे एखादी विनाशकारी तामसी शक्ती असते..? अनुत्तरित प्रश्न."

"या अनुषंगाने आता मी तुमची कशासाठी भेट घेतली हे सांगण्याची संधी मला मिळाली आहे. ती सांगण्यापूर्वी व्यवहारातलं आणखी एक उदाहरणं देतो. सर्वच पदार्थ उघड्यावर ठेवले की त्यांच्यावर काहीना काही परिणाम होतो. काही बाष्पाच्या रूपाने हवेत कणाकणाने झिरपतात, काही पाणी शोषून जरा दमट होतात, काहींचा प्राणवायूशी संयोग होऊन ते गंजतात. पण काही काही पदार्थांमधे हे गुण अति तीव्र मात्रेमधे असतात. उदाहरणार्थ - आयोडीन. आयोडीनचे स्फटिक उघड्यावर ठेवले तर त्याचा पाहता पाहता वायुरूप आयोडीन होऊन जातो. ते कॅल्शिअम क्लोराईड ते डब्यावर ठेवलं तर इतकं पाणी शोषून घेतं की शेवटी त्याचा अगदी लगदा होतो. नाहीतर तो सोडियम धातू - तो जर उघड्यावर ठेवला तर प्राणवायूशी संयोग करून इतका तापतो की खालचा कागदही होरपळेल. तो सतत पाण्यातच ठेवावा लागतो. माणसाच्या मानसिक व्यवहारातही असा मात्रांचा फरक असतो. संभाजीराव तुमच्या मनात अव्यक्तपणे आलेली कोणा पूर्वजाच्या आत्महत्येची आठवण अगदी पुसट होती - तरीही या वास्तूत तिला एक दृश्य साकार आला. पण ज्यांचे विचार असे खोलवरच्या पातळीवर दडपलेले नाहीत, त्यांचा निर्यास अगदी सतत होत असतो असं जर कोणी या वास्तूत आलं तर..? हा प्रश्न विचारण्याचं एक कारण आहे. इतक्या दिवसांच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर माझी खात्री पटली आहे की अशा अनैसर्गिक घटनांशी काही खास मानसिक धाटणीचे लोक आणि शिवाय काही विशिष्ट गुणधर्म असलेला अवकाश या दोन्हींची आवश्यकता असते. तुमच्या माहूलगावचा वाडा ही या दृष्टीने अगदी आदर्श अशी जागा आहे. गावापासून दूर, उत्तम स्थितीत, राहण्याची छान सोय असलेली अशी जागा म्हणजे एकतर अंधाऱ्या पडक्या वाड्यातली तळघरं, नाहीतर गावठाणाबाहेर मसणवटीजवळचा एखादा मोठा वृक्ष नाहीतर रानावनातली आडबाजुची एखादी कपार - अशा असतात."

"पण तुमच्या मनात काय आहे ते तुम्ही अजून सांगितलं नाही डॉक्टर..!"

"ही सगळी प्रस्तावना त्याच्यासाठीच तर आहे. तुम्हाला सांगितलंच आहे, अशा घटनांची मी तपशीलवार नोंद ठेवत असतो. त्यात घरावर दगड पडण्याचे - ज्याला लोक भानामती म्हणतात असे प्रकार आहेत. एखाद्या व्यक्तीला ती राहात असलेल्या जागी आपल्या पूर्वजन्मीच्या आठवणी आल्याचे प्रसंग आहेत. आणखीही कितीतरी. पण म्हणजे व्यक्ती आणि स्थान दोन्ही घटक महत्वाचे आहेत."

"संभाजीराव आता माझ्या मनातली कल्पना सांगतो. तुमची जर परवानगी असेल तर माहूलच्या तुमच्या वाड्यामधे पूर्वी ज्यांना ज्यांना हे अनुभव आले आहेत अशी माणसं काही दिवसांसाठी राहायला आणायची आणि हे दोन घटक एकत्र आले की काय होतं ते पाहण्याची माझी कल्पना आहे. तुम्हाला आधीच सांगतो - केवळ शाब्दिक परवानगी देण्यापलीकडे तुम्हाला कोणतीही तोशीस पडणार नाही. त्याचप्रमाणे त्या वास्तूत काहीही घडलं तरी त्याची कोणतीही जबाबदारी तुमच्यावर येणार नाही याची मी तुम्हाला लेखी हमी देईन. सर्व परिणामांना सर्वस्वी आम्हीच जबाबदार असू."

"पण डॉक्टर, तिथं तर जेवणाखाणाची काहीच सोय नाही."

"गणपत मिस्त्रीच्या ओळखीने सकाळ संध्याकाळच्या स्वैपाकासाठी आणि धुण्याभांड्याचं काम करण्यासाठी एखादी बाई मिळेल अशी माझी खात्री आहे. मला माहीत आहे, माहूलगावातलं कोणीही वाड्यावर मुक्कामासाठी राहायला तयार होणार नाही - पण आम्ही ती अपेक्षाही करीत नाही. सूर्योदयानंतर बाईने नेमानं भांडी साफ करावीत, सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक करून ठेवावा. आणि दुपारी धुणीभांडी उरकून दिवस मावळायच्या आत परत गावाकडे जावं. मला वाटतं मनासारखा पगार मिळाला तर एवढ्या कामासाठी बाई नक्कीच मिळेल."

"डॉक्टर, हे सगळे तुमचे अंदाज आहेत. माझा तर तुम्हाला सल्ला आहे की या भानगडीत तुम्ही पडूच नये - पण अगदी मनाशी ठरवलंच असलं तर गावाला पुन्हा एकदा भेट द्या. तुम्ही म्हणता तशी सोय होण्यासारखी आहे का ते पहा - मग आपण पुन्हा भेटूया - माझ्या परवानगीचं म्हणत असाल तर तुमच्या विनंतीला नकार कसा देणार..? शेवटी सर्व जबाबदारी तुम्हीच आपल्या शिरावर घेत आहात की..!"

"संभाजीराव, मी तुमचा खरोखरच आभारी आहे. मनात कल्पना तर आहे - आता काय काय कसं जमतं त्याचा अंदाज घेतो आणि मग पुन्हा आपली भेट घेतो."

जेजी खुर्चीवरून उठताच संभाजीरावही उठले. आणि जेजीचा हात हातात घेत म्हणाले, "डॉक्टर, आज मला खूपच नव्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. तुमची कल्पना प्रत्यक्षात येवो अथवा न येवो आपल्या भेटीगाठी चालूच राहाव्यात अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. रोजच्या घटनांकडे एका एकदम वेगळ्याच नजरेने पाहण्याची दृष्टी तुम्ही मला दिली आहे. त्याबद्दल मला तुमचे आभार मानायला हवेत."

संभाजीरावांना नमस्कार करून जेजी त्यांच्या कार्यालयामधून बाहेर पडले. माहूलगावला दिलेली भेट जशी कल्पनेबाहेर यशस्वी झाली होती. तशीच संभाजीरावांची भेटही अत्यंत आशादायक ठरली होती.

संभाजीरावांनी फारसे आढेवेढे न घेता वाड्यावर मुक्काम करायची परवानगी दिली त्यामुळे जेजींना मोठाच हुरूप आला होता. आता त्यांना आपल्या पुढच्या सर्व कार्यक्रमांची आखणी करण्याचा मार्ग खुला झाला होता. वाड्यावरच्या दोन तीन दिवसांच्या मुक्कामाची त्यांना फारशी फिकीर वाटत नव्हती. दोनतीन दिवस पुरतील असे अन्नपदार्थ बरोबर ठेवले की जेवणाखाण्याचा प्रश्न मिटला. शक्यतोवर पेपर डिश आणि प्लॅस्टिक ग्लास वापरले की भांड्यांचाही प्रश्न निकालात निघत होता. वाड्यावर विहीर असणार. तेव्हा पाण्याचा प्रश्नही नव्हता. ज्यांना ज्यांना ते निमंत्रण करणार होते त्यांनी स्वतःबरोबर तीन दिवसांचे कपडे आणि झोपण्यासाठी होल्डऑल आणायचा होता. तेव्हा गाद्या-चादरी-उशा यांचाही प्रश्न नव्हता. आता वाड्यावर जाण्यासाठी कोणाकोणाची निवड करायची हे ठरवण्याची वेळ आली होती. आणि अर्थात त्यांनी निमंत्रण दिलं की सगळे अगदी लगोलग तयार होतील असं मानून चालणंही चूक ठरणार होतं. काहींचे पत्ते बदलले असतील. काहींना-विशेषतः स्त्रियांना - घरातून विरोध होण्याची शक्यता होती. पूर्वीच्या अनुभवाने जीव पोळल्यामुळे पुन्हा त्या वाटेला न जाण्याचा निर्धारही काहींनी केला असेल. एवढ्या असंख्य चाळण्यातून गाळून शेवट हातात पाचसहा नावं आली तरी भाग्यच. जेजी स्वतःशी विचार करत होते - अनुभव वीस वर्षांपूर्वीपेक्षा जास्त मागचा नको. तसंच व्यक्तीचं वय साधारण पस्तीस छत्तीसपेक्षा जास्त नको.

त्यांच्या टिपणवहीतली नावं पाहता पाहता एका नावापाशी थांबले.

~~~~~~~~~

अनंत सीताराम जोशी. वय वर्ष चौदा. वडील भिक्षुकी करणारे. आई घरीच पापड कुरड्या, इत्यादी जिन्नस करून विकत असे. शहरातल्या अगदी जुन्या वस्तीत दामले यांची एक चाळ वजा इमारत होती. तीसपस्तीस भाडेकरू तरी नक्कीच असतील. हे जोशी कुटुंब तिसऱ्या मजल्यावरच्या दोन खोल्यांच्या जागेत राहात असे. वर छप्पर म्हणजे नालीचे पत्रे. तशी उन्हाळ्यात अंगाची अगदी लाही लाही व्हायची - पण त्या तापत्या छपराचा एका मोठा फायदा होता. अनंताची आई, जेनुबाई, तिचं कुरड्या, पापडांचं वाळवण पत्र्यावर करू शकत होती. वाड्यात अंगण होतं पण तिथे कधी ऊन असायचं नसायचं आणि वाड्यात वावरणारी व्रात्य पोरं अंगणात काय जिनसा टिकू देतात..? आणि वाळवणावर सतत नजर तरी कशी ठेवणार..? तसे सीतारामपंत कुडमुड्या भटजीच्या जातीचेच. जन्मभर हलाखीत दिवस काढल्याने कोणाकडे मान वर करून दोन शब्द सुनावण्याची हिम्मतच अंगात नव्हती. जानुबाई मात्र तोंडाने तिखट, अगंला लगेच कागं करणारी, कोणाचा एक शब्द खाली पडू न देणारी मोठी तोंडाळ बाई. नवल नाही वाड्यातल्या बिऱ्हाडांशी तिचा छत्तीसचाच आकडा होता. आणि मालक तर सदान् कदा संतापलेले. पत्रा काही तुम्हाला भाड्याने दिलेला नाही - त्याचा तुम्ही गैरवापर करता आहात - वकिलामार्फत नोटीसच देणार आहे - ते नेहमी धमकी देत - पण वकिलाच्या नोटिशीचे दहापंधरा रुपये देण्याची तरी त्यांची ऐपत कोठे होती..? बिऱ्हाडांची भाडी काय तर आठ दहा बारा रुपये अशी. शिवाय हजार तक्रारी. त्यानी ते आधीच कावलेले. त्यात ही आणखी भर घालून घ्यायची त्यांची कुवतच नव्हती. शेवटी मध्यमवर्गीय मन - खरे किंवा काल्पनिक अन्याय स्वतःवर चरफडत सहन करण्याची त्यांचीही मध्यमवर्गीय मानसिकता होतीच.

अशा या जोशी कुटुंबाचं नाव एकदम वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं. त्यांच्या पत्र्यावर रात्री दगड पडण्याचा आवाज यायला लागला. दगडांचा आवाज येत होता हे निर्विवाद सत्य आहे. त्याला अक्षरशः शेकडो लोकांचा पुरावा होता. आता अशी अनैसर्गिक घटना म्हणजे अफवांना निमंत्रणच की..! नाही नाही त्या तर्ककुतर्कांचं मोहोळ उठलं नाही तरच नवल..! अंधश्रद्धाळू आणि भाकडकथांवर विश्वास ठेवणारांच्यात पहिली आवई उठली ती भानामतीची. हौशे आणि नवशे सदासर्वकाळ असतातच. अपघात झाला तर ती जागा पाहायलासुद्धा माणसं जमतात. तेव्हा नवल नाही या जोश्यांच्या घराची वर्दळ एकदम वाढली तर..! इतर वेळी जनूबाई दिसली की नाक मुरडणाऱ्या शेजारणी "हे काय झालं हो..? असं कसं झालं हो..! काय अक्रित आलंय तुमच्यावर..!" असल्या कोरड्या आणि खोट्या सहानुभूतीचे चार थेंब टाकण्यासाठी जोश्यांच्या घरात यायला लागल्या. खरं तर सर्वांनाच जिथे दगड पडण्याचा आवाज येत होता ती छपरावरची पत्र्याची जागा पहायची होती. वर जायला बाहेरच्या खोलीतूनच शिडी होती आणि वर चार बाय तीनचं पत्र्याचंच वर ढकलून उघडायचं दार होतं. पण जनुबाईनी त्या दाराला कुलूपच लावून टाकलं होतं. कोणालाही वर जाऊ दिलं नाही.

अर्थात प्रकरण शेवटी शेजारच्या पोलीस चौकीपर्यंत पोहोचलंच. अर्थात तसा कोणालाही प्रत्यक्ष त्रास किंवा इजा किंवा नुकसान झालं नव्हतं. पोलीस तरी काय नोंद करणार..? पण एकदोन वजनदार लोकांच्या आग्रहाखातर शेवटी एक साधा पोलीस चौकशीसाठी जोश्यांच्या घरी आला आणि अर्थात त्याच्यासाठी आणि त्याच्याबरोबरच्या वशिल्याच्या एकदोघांसाठी - जनुबाईना वरचं दार उघडावं लागलं. पत्र्याचा आकार साधारण बावीस बाय बाराचा होता. पण वर येताच आधी दिसले ते साधारण मुठीएवढे पाचसहाशे ग्रॅम वजनाचे पंधरा सोळा दगड आणि अर्ध्या विटांचे चारपाच तुकडे. त्या तुकड्यांकडे पाहात शिपाई म्हणाला, "म्हणजे लोकांना दगडाचा आवाज येत होता हे तर खरंच आहे..."

"नाही नाही तसं नाही.." जनूबाई म्हणाल्या.

"तसं नाही..? मग हे दगड विटा आलं कोठून..?"

"अहो, मीच अंताला खालनं आणायला लावलेत.."

"तुम्ही.."

"अहो हे पहा -" जनुबाईंनी कोपऱ्यातली एक मोठी वीट उचलली आणि तिच्याखाली ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या घड्या आणि जुन्या साड्या दाखवल्या. "अहो, मी ही उन्हाळ्याची वाळवणाची कामं करते ना - पापड कुरड्या पापड्या ते इथं पत्र्यावर प्लॅस्टिकवर वाळत घातलेलं असतं - आणि वरून धूळ कचरा पडू नये म्हणून त्यांच्यावर चारी बाजूंनी दगड विटांचे तुकडे असं काहीतरी ठेवते - त्याकरता तर वर असे दगड आणून ठेवलेत."
"पण तुम्हीही दगड पडल्याचा आवाज ऐकलात की नाही..?"

"ऐकलं की..! साऱ्या जगाला ऐकू येतं ते मला येणारंच. पण हे दगड पहिल्यापासूनच आहेत एवढं सांगते -"

जनुबाईच्या शब्दांनी - ज्याला समोर प्रत्यक्ष पुरावा होता - सगळेच एकदम निरुत्तर झाले होते. पाचसात मिनिटं पत्र्यावरच घुटमळून मग शेवटी सगळे खाली आले. मागे जनूबाईंनी दाराला काडी लावून टाकली.

स्वतःशीच काहीतरी पुटपुटत पोलीस निघून गेला. बाकीची माणसंही आपापल्या घरी गेली. जेजींची नोंद थांबली होती. ही घटना एकोणीसशे शहाण्णव मधे घडली होती. म्हणजे बारा वर्षांपूर्वी. त्यावेळी त्यांनी नुकतीच डॉक्टरेट घेतली होती. या जरा आडमार्गावरच्या घटनांचा शोध घ्यायचा असा अर्धवट विचार मनात होता - म्हणून त्यांनी टीव्ही, वर्तमानपत्र, रेडिओ इत्यादी माध्यमातून आलेल्या अशा घटनांची नोंद करून ठेवली होती. पण त्यापुढे काही केलं नव्हतं. मग तीन चार वर्षांनी जेव्हा त्यांनी आपला जीवनमार्ग निश्चित केला तेव्हा या घटनांचा अधिक खोल तपास करण्याची आवश्यकता भासायला लागली.

मग एका सकाळी त्यांनी त्या जोशी कुटुंबालाच भेट द्यायचं ठरवलं, ते त्या पत्त्यावर गेलेही - पण जोशी जागा सोडून गेले होते. आणि त्यांची आसपासच्या कोणाशीच असे आपुलकीचे संबंध नव्हते, की ज्यांना त्यांचा नवीन पत्ता जाणून घ्यायची इच्छा होती. म्हणजे जेजींचा शोध इथंच संपल्यासारखा होता. पण एक अगदी अंधुक अशा होती - सुरुवातीची नावं पाहता एक नाव त्यांच्या समोर आलं.

अनंत सीताराम जोशी

मोठीच दिलासा देणारी गोष्ट. हा अनंत तोच असला तर अर्थात - पण त्यांनी पत्ता आणि फोननंबर आपल्या टिपणवहीत ठेवला. वेळ पडली तर ते या अनंताची गाठभेट घेणार होते.

~~~~~~~~~

क्रमशः...

(तळटीप: - ग्रुपवरील अ‍ॅडमीनच्या पूर्वपरवानगी शिवाय ही कथा इतर कुठेही पोस्ट करण्यास सक्त मनाई आहे.)





भाग ०३                                                        भाग ०५