Disclaimer







     
            Welcome to Marathistories .

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~

Thursday 25 January 2018

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~ भाग ०५

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~ 
मूळ लेखक - नारायण धारप आणि डॉ. अरुण मांडे

भाग ०५

तशा त्यांच्या टिपणवहीत नोंदी खूप होत्या - काही परगावच्या काही वेगळ्या राज्यातल्या, काही तर परदेशातल्या, आताच्या क्षणी जेजींना फक्त स्थानिक घटनात स्वारस्य होतं. त्या घटनात गुंतलेल्या लोकांशी संपर्क साधणं सोपं होतं - शिवाय त्यांच्या पुढच्या एका नावापाशी जेजी थांबले.

पारू धोंडिबा म्हातरे.

ही नोंद काही टीव्ही, वर्तमानपत्रं यातील बातम्यांवरून केलेली नव्हती - तर त्यांचे एक मित्र देशपांडे यांच्याकडून त्यांना ती माहिती मिळाली होती. एव्हाना जेजींच्या मर्यादित मित्रपरिवारात त्यांच्या छंदाची सर्वांना माहिती होती. तेव्हा देशपांड्यांचा फोन ही काही फार मोठी अनपेक्षित गोष्ट नव्हती.

"जेजी, वेळ आहे ना - मग एक तर -"

अशी सुरुवात करून देशपांड्यांनी पारूची हकीकत सांगितली होती. पारूचं वय सात-आठ वर्षांचं होतं. तिची आई रखमा देशपांड्यांच्या घरचं काम करीत असे. ती संध्याकाळची घाईघाईने देशपांड्याकडे आली. गेले दोन दिवस पारूला ताप येत होता. पण आता ताप एकदम एकशेपाचच्या वर गेला होता. आणि पारूची शुद्ध हरपली होती. देशपांड्यांनी आपल्या एका निकट स्नेही डॉक्टरांना फोन केला आणि रखमाला पारूला त्यांच्याकडे न्यायला सांगितलं. जेजी, ताबडतोब हालचाली झाल्या म्हणून पारू वाचली - आणखी काहीवेळ गेला असता तर तिची काही धडगत नव्हती. पण योग्य वेळी योग्य ते उपचार झाले आणि तिच्या जीवाचा धोका टळला. चार दिवसांनी तिला त्यांनी घरी आणलं. अगदी खूपच अशक्त झाली होती. मग घरातल्या घरात हिंडायफिरायला लागली होती. जेजी, आता नीट एका हं - एका संध्याकाळी पारुत अगदी विलक्षण विश्वासच न बसण्यासारखा बदल झाला. आता आताशी ती जेमतेम चतकोर भाकरी खायला लागली होती. पण त्या संध्याकाळी काहीतरी भलतंच घडलं होतं. पारुने पानातला भाकरीचा चतकोर तर संपवलाच - "आई, आणखी घाल ना..!" म्हणाली. बिचारी रखमा..! तिला पोर सुधारते आहे याचा केवढा आनंद झाला. तिने पारूच्या पानात आणखी चतकोर वाढला - तोही पारुने पाहता पाहता फस्त केला - आणि मग तर गोष्ट भलत्याच थराला गेल्या. पारूची एक पुरी भाकरी खाऊन झाली तरी ती आणखी मागतच होती. काही केल्या ऐकेना. रखमाला काही हे लक्षण चांगलं दिसलं नाही - पण ती नाही म्हणताच पारुने मोठ्याने भोकाडच पसरलं - "मला भूक लागलीय, आणखी वाढ ना..!" तिचा आपला घोषा सुरूच. शेवटी दोन सबंध भाकऱ्या खाल्ल्या तेव्हाच पारूची भूक शांत झाली. पण हा काही अपवाद नव्हता - प्रत्येक जेवणाच्या वेळी हाच तमाशा. सकाळ संध्याकाळ ही आठ वर्षांची पोर दोन दोन भाकऱ्या खायला लागली.

"जेजी मोठी चमत्कारिक वाटते नाही कां ही हकीकत..? पण हे तर काहीच नाही. आणखी विलक्षण गोष्ट ऐकायची तयारी ठेवा - तर मग ही रखमा बिचारी अगदी घायकुतीला आली होती. तेव्हा मी तिला पुन्हा एकदा पारूला घेऊन डॉक्टरांकडे जायला सांगितलं आणि एकदोन दिवसातच मला डॉक्टरांचा फोन आला "देशपांडे, ही तुमची पारूची केस मोठी विलक्षण आहे हो..!" ते म्हणत होते. "विलक्षण म्हणजे काय..?" मी त्यांना विचारलं. "अहो देशपांडे तिच्या वागण्याचं काही स्पष्टीकरण होत नाही हो - एकदा येऊन भेटता का..? मग प्रत्यक्षच बोलू -"

"जेजी, मी डॉक्टरांच्याकडे गेलो. पारूच्या घरची परिस्थिती काही तिला स्पेशल रुममधे ठेवण्यासारखी नव्हती - पण डॉक्टरांनी तिला एका स्पेशल रुममधे ठेवलं होतं. मी तिथे पोहोचताच ते म्हणाले, "देशपांडे, एकदा या पारूला पाहून घ्या मग आपण बोलू.." आम्ही खोलीत गेलो. पारू खाटेवर झोपली होती. आठनऊ वर्षांची नुकतीच आजारातून उठलेली मुलगी शरीर खंगलेलंच होतं. खाटेशेजारी तिची आई बसली होती. आम्हाला पाहताच ती उठायला लागली. डॉक्टरांनीच तिला बसून राहण्याची खूण केली. आम्ही दोघं खाटेशेजारी चारपाच मिनिटं उभे राहून पारूकडे पाहत होतो. ती अगदी शांत झोपली होती. मग खूण करून डॉक्टरांनी मला त्यांच्या केबिनमधे आणलं. "देशपांडे पाहिलंत ना, आज तिचा तिसरा दिवस आहे. घरची माणसं डबा आणतात - डबा पाहिलात तर तुमचा विश्वास बसणार नाही की हा डबा एका आठनऊ वर्षांच्या आजारी मुलीसाठीचा आहे. अहो, चांगल्या जाड जाड दोन भाकरी, झणझणीत मसालेदार भाजी आणि चटणी. आणि ही पारू ते सगळं एका खेपेत संपवते. मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं नसतं तर माझा विश्वास बसला नसता. आणि परत संध्याकाळी तोच प्रकार. तिच्या वजनात एका ग्रॅमनेही वाढ झालेली नाही. बरं एवढं खाते तर काही अपचन झालं आहे, पोट बिघडलं आहे असाही काही प्रकार नाही. सगळ्या शारीरिक तपासण्या केल्या - थोडासा ऍनिमिया आहे - या पारूला इथं कशासाठी ठेवून घ्यायची..? मी तिला काय ट्रीटमेंट देतो आहे..? काही नाही. केस विलक्षण आहे - पण माझ्या अवाक्यापलीकडची आहे." "पण डॉक्टर एखादा स्पेशालिस्ट..?" मी विचारलं. तर ते म्हणाले, "कोणत्या फिल्डमधला स्पेशालिस्ट..? सांगा की. नाही मी तर तिला सरळ घरी पाठवणार आहे. मग खरोखरच त्यांनी तिला दुसऱ्या दिवशी घरी पाठवून दिली."

"मग..?" जेजींचं कुतूहल अर्थात जागं झालं होतं.

"जेजी, डॉक्टर मला एवढं मात्र म्हणाले - देशपांडे, मला हि साधी केस वाटत नाही. शारीरिक तक्रार बिघाड काहीही नाही - मला वाटायला लागलं आहे या पारूच्या मनावरच काहीतरी परिणाम झाला असावा. पण ते क्षेत्र माझं नाही. तिला एखाद्या सायकोथेरपिस्टकडे किंवा एखाद्या सायकियाट्रिस्टकडे न्यावं लागेल आणि या लोकांना ते कसं परवडणार..? तेव्हा तसला व्यावहारिक सल्ला देण्याची चूक मी करणार नाही."

"मग..?" जेजींनी विचारलं.

"मग काय, ती पारू घरी आहे."

"आणि ते खाण्याचं - ते अजूनही -"

"अगदी तसंच जरा जास्तच. आता तर कधी कधी ती घरातली कच्ची भाजीही खाते. घरचे काय करणार बिचारे. मुकाटपणाने जे काय चाललं आहे ते पाहात राहतात आणि आपल्या कर्माला दोष देतात."

"देशपांडे, मला एकदा त्या पारूला भेटता येईल का..?"

"का नाही..? केव्हाही - पण जेजी, तुमचा विचार काय आहे..?"

"मनात एक कल्पना आहे- जरा स्पष्ट झाली की तुम्हाला सांगेनच - पण भेट केव्हा ठरवता..?"

केव्हाही. अगदी उद्याही. ती रखमा माझ्याकडेच कामाला आहे ना. तिला सांगितलं की ती पारूला बरोबर आणेल."

"मग उद्या सकाळी..? नऊ साडेनऊच्या सुमारास..?"

"अगदी नक्की. या तुम्ही नऊ वाजता..."

~~~~~~~~~

अपारंपरिक घटनांचा अभ्यास - निदान नोंद - हेच जेजींचे साध्य होतं. त्यामुळे अर्थात ऍबनॉर्मल सायकॉलॉजी, फोबियाशी, सायकोसिसशी संबंधित घटना त्यांच्या निरीक्षणाच्या परिघात येणार. आणि मानसशास्त्र म्हटलं की हिप्नॉटिझम - संमोहनशास्त्र हेही आलंच. दोन शतके सर्वसामान्य माणसाला ज्ञात झालेली - पण मानवी इतिहासात गुप्तपणे वापरली गेलेली - ही ज्ञानाची शाखा. तिचं अस्तित्व तर नाकारता येत नव्हतंच, पण तिचं समर्पक स्पष्टीकरणही करता येत नव्हतं. हिप्नॉटिझम करणारा आणि हिप्नोटाईज होणारा यांच्यात काही घटक आवश्यक होते का..? काही खास लोकांनाच ही विद्या आत्मसात करता येत होती का..? त्याला काही विशिष्ट प्रकारचा स्वभाव म्हणा, सराव म्हणा, अभ्यास म्हणा, हे काही आवश्यक होतं का..? की ती एक निसर्गदत्त देणगीच होती..? अर्थात जेजींनी त्या विषयाची अनेक पुस्तकं वाचली - आणि त्यांच्या स्वभावास अनुसरून - जमले तसे, जमले तेव्हा प्रयोगही केले. काही वेळा त्यांना यश आलं, काही वेळा ते अपयशी झाले. पण आपल्या शास्त्रांच्या भात्यात आणखी एक बाण जमा झाल्याचं समाधानही लाभलं.

आता एकाएकी त्यांच्या मनात विचार आला, या पारुवर आपण हा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे..? तिला धोका तर काही नव्हता - निदान प्रसंगातली एखादी बाजू अंधारात असेल तर तीही प्रकाशात येईल. मुख्य म्हणजे ज्ञानार्जन याखेरीज त्यांच्या मनात इतर कोणताही हेतू नव्हता.

~~~~~~~~~

बरोबर नऊ वाजता जेजी देशपांड्यांच्या ब्लॉकवर हजर झाले. "या या जेजी," देशपांडे हसत म्हणाले, "या.." दोघं हॉलमध्ये बसले होते.

"काय आली आहे ती पारू..?" जेजींनी विचारलं.

"हो आली आहे - बोलावतोच तिला - पण आधी एखादा कप चहा..?"

"हरकत नाही..." जेजी म्हणाले. चहाचा ट्रे न्यायला रखमा खोलीत आली तेव्हा देशपांडे तिला म्हणाले, "रखमा, पारूला जरा बाहेर पाठवून दे - हे डॉक्टर आहेत - तिला पाहायला आले आहेत - पण तिला सांगू नकोस - नुसती बाहेर पाठव.."

तीनचार मिनिटांत पारू हॉलमधे आली. नऊ वर्ष वयाच्या मानाने शरीराने जरा किरकोळच, रंग खूपच सावळा, पण चेहरा तरतरीत, दोघांकडे आलटून पालटून पाहात ती उभी होती. "बस पारू.." जेजी म्हणाले. ती खुर्चीच्या अगदी कडेवर बसली. खिशातून एक चॉकलेटचा बार काढून जेजींनी तो तिच्याकडे दिला. "आवडतं ना चॉकलेट..?" वडी पाहताच तिचा चेहरा खुलला होता पण बुजून ती जागच्याजागीच बसून होती. "घे घे ना..!" जेजी म्हणाले. एकदा देशपांड्यांकडे पाहून ती पुढे झाली आणि तिनं चॉकलेटचा बार हातात घेतला. "बस जा खुर्चीवर आणि आताच खाल्ला तरी चालेल." जेजी म्हणाले, "नीट आरामात बस. मी तुला काही काही विचारणार आहे. ठीक आहे..? खाता खाता बोललीस तरी चालेल. तर मग - तुला आठवतं का की तुला डॉक्टरांनी काही दिवस हॉस्पिटलमधे ठेवलं होतं..?"

"हो आठवतं.."

"डॉक्टरांनी काही इंजेक्शन दिली का..?"

"नाही.."

"काही कडू औषधं दिली का..?"

"नाही.."

"मग घरी पाठवून दिलं.."

"हो.."

"छान, आता मी आणखी काही विचारणार आहे - पण अशी आखडून बसू नकोस - आरामात बस. मागे सरक - पाठ मागे टेकव - मान मागे टेकव - हात खुर्चीच्या हातावर ठेव - छान. विचारतो त्याची सरळ उत्तरं द्यायची काय..? छान. आधी एक सांग - तुला कितीपर्यंत आकडे मोजता येतात..?"

"शंभर पर्यंत.."

"छान छान, लाग बरं एकापासून मोजायला..."

पारू घाईघाईने एक दोन तीन चार असे अंक मोजायला लागली.

"थांब थांब इतकी घाई करायची नाही - सावकाश मोजायचे - म्हणजे एक... दोन... तीन... असे - "

"एक... दोन... तीन..."

"पारू, मागे तुकवून आरामात बस ना..! डोळे मिटलेस तरी चालेल - अस्सं -"

जरा वेळाने जेजी म्हणाले - बघ - हात जड होताहेत ना..? झोप आल्यासारखी वाटते ना..? मग झोपलीस तरी चालेल - खुशाल झोप -"

पारूचे शब्द अडखळत यायला लागले. आणि सातपाशी थांबले.

"पारू..!" जेजी पुढे वाकून म्हणाले, "ऐकू येतं का..?"

"हो.."

"समजतं का मी बोलतो आहे ते..?"

"हो.."

"मग आता तू झोपणार आहेस - पण मी पारू, एक दोन तीन म्हणताच तुला जाग येणार आहे. समजलं..? एक दोन तीन म्हणताच..! समजलं..?"

"हो.."

"पारू.." जेजी जरा गंभीर आवाजात म्हणाले, "आता पहा हं - रोज संध्याकाळची तू घरी एकटी असतेस तेव्हा घराच्या दारात बसतेस..?"

"हो,"

"काय करतेस..?"

"चाळीच्या अंगणात मुलं खेळत असतात ते पाहते.."

"पण मुलं नसतील तर..?"

"अंगणात पिंपळाचं मोठं झाड आहे - कधी कधी अगदी वरच्या पानावर ऊन पडलेलं असतं - ती पण कशी चकचक करतात, ते पाहात बसते - "

"तशीच त्या संध्याकाळी बसली होतीस तेव्हा काहीतरी झालं - हो ना..?"

"हो.."

"काय झालं.."

"झाडाच्या फांदीवर हुप्प्या माकडासारखं काहीतरी बसलेलं होतं - मग ते एकदम खाली उतरलं आणि माझ्या जवळून घरात गेलं - मी किती भ्यायले..!"

"मग..?"

पण पारूचं काहीच उत्तर आलं नाही. ती नुसती डोळे मिटून बसून होती.

"पारू..? सांग - मग काय झालं..?" जेजींचा आवाज कठीण झाला होता.

दोन तीन सेकंदातच पारूचे डोळे खाडकन उघडले. डोळे इतके विस्फारलेले होते की त्यांच्यात बुबळेमधे तरंगताना दिसत होती. तिचा चेहराही बदलत होता. कपाळावर आठ्या आल्या होत्या. आणि तोंड हळूहळू उघडले - चेहऱ्यावर लाली आली होती - आणि चेहऱ्यावर जे हास्य होतं ते इतकं विलक्षण होतं की शरीरावर काटाच यावा आणि मग ती बोलली - पण आवाज आला तो नऊ वर्षांच्या मुलीचा नव्हता तर पुरुषी होता. राकट होता, उद्दाम होता.

"तिला कशाला विचारतोस..? ती काही सांगणार नाही, मला विचार की.." आयुष्यात जेजींनी इतका शीघ्र विचार कधी केला नव्हता - एका क्षणात त्यांच्या लक्षात आलं - प्रकरण आपल्या हाताबाहेर जात आहे. आपण काही यातले तज्ज्ञ नाही - हा प्रांत आपला नाही, एखादं प्रवेश बंद दार उघडून आत जावं तसं त्यांना वाटलं. हा अवकाश अपरिचित होता. कदाचित धोक्याचंही असेल - इथे काहीही होऊ शकतं. नाही हे दार तात्काळ बंद करायला हवं..!

एवढ्या विचाराला त्यांना सेकंदभरही अवधी लागला नसेल.

"आता का रे दातखिळी बसली..?" तो भसाडा आवाज लहानशा पारूच्या तोंडून येत होता. "तिला तावातावाने विचारत होतास ना..? मग मी सांगतो. ऐक मी झुंगू आहे. वडपिंपळाच्या झाडावर वस्ती करून असतो - पण कधीकधी असं नवीन झाड मिळतं." स्वतःच्या दोन्ही खांद्यांवर पारुने हात थोपटले. "पाहिलंस ना..? पिंपळाचं नवीन झाड सोडून मी हे नवीन झाड धरलं आहे - तिला जन्मभर सोडणार नाही. आता ती लहान आहे. दोन भाकऱ्यावर मी सध्या भागवतो आहे - पण तिला जरा मोठी होऊ दे - मग पहा कशी -"

इथपर्यंतचा भाग मा. श्री. नारायण धारप यांनी लिहिला होता. कादंबरीचा या पुढील भाग डॉ. अरुण मांडे यांनी पूर्ण केला आहे...

~~~~~~~~~

नवल नाही जेजी थोडेसे घाबरलेच होते. त्यांच्या कपाळावर घाम आला होता. हातांनीच पुसताना ते विचार करत होते. हे लवकरात लवकर थांबायला हवं होतं.

"तू जा आता," ते म्हणाले.

"मी जाईन नाही तर नाही जाणार. माझी मर्जी," झुंगू म्हणाला.

"तू आता जा.." जेजी पुन्हा म्हणाले.

त्यांना आता पारूची काळजी पडली होती. त्यांनी आपल्या जबाबदारीवर तिला इथं आणलं होतं. तिला संमोहनावस्थेत त्यांनी नेलं होतं खरं, पण आता जर ती पूर्वपदावर आली नाही तर..?

"झुंगू.." त्यांनी हाक मारली.

पारूकडून उत्तर आलं नाही.

"झुंगू.." त्यांनी पुन्हा हाक मारली.

पारू गप्पच होती. तिनं डोळे मिटून घेतले होते.

"एक दोन तीन.." जेजी म्हणाले, त्यांच्या आवाजात निकड होती. अधिरपणा होता. अस्वस्थपणा होता. ते एकटक पारूकडे बघत होते.

आणि पारुने खाडकन डोळे उघडले. आणि ती म्हणाली, "अठ्ठयाणव नव्याणव शंभर..." "शाब्बास.." जेजी म्हणाले. त्यांनी समाधानाचा एक सुस्कारा टाकला.

पारुने हातातल्या चॉकलेटकडे एकदा बघितलं आणि विचारलं, "मी खाऊ का..?"

"खा, खा नं..!" जेजी म्हणाले.

पारुने शांतपणे चघळत चघळत चॉकलेट संपवलं. तिला आणखी एक हवं होतं. पण पुन्हा मिळेल अशी शक्यता वाटेना. म्हणून तिनं विचारलं, "मी आता जाऊ..?"

"जा, जा नं..."

देशपांडे हा सगळा प्रकार बघत होते. त्यांनी लगेच रखमाला बोलावलं आणि पारूला न्यायला सांगितलं.

त्या दोघी आत गेल्यावर देशपांडे म्हणाले, "जेजी.."

"देशपांडे काही बोलू नका. जे झालं ते तुमच्यासमोरच झालंय. या पारूनं मला कोड्यात टाकलंय. तिला मी संमोहनावस्थेत नेण्याचा हेतू वेगळा होता. तिला सारखं सारखं खाण्याची जी सवय लागलीय ना -"

"रखमा त्याला भस्म्या रोग म्हणते..." देशपांडे म्हणाले.

"भस्म्या, चांगला शब्द आहे आणि अगदी योग्य आहे. पण तो रोग आहे की नाही माहीत नाही आणि असला तर त्याचं कारण शोधणं आवश्यक आहे. डॉक्टरांनी तर आधीच सांगितलंय त्यांना याचं कारण काही सापडत नाही म्हणून. हे असे रोग बहुधा मानसिक असतात. अनोरेक्झिआ नव्र्होझा नावाचा एक मानसिक रोग आहे. तरुणींमधे या रोगाचं प्रमाण जास्त आहे. अतिशय नैराश्य आलेल्या व्यक्तीला हा रोग होतो. तिची अन्नावरची वासना उडते. कित्येक दिवस ती अन्नपाणी वर्ज्य करते. आणि वेळीच इलाज केला नाही तर ती अक्षरशः खंगून खंगून मरते. देशपांडे, लठ्ठपणा हासुद्धा एक मानसिक रोग आहे. मनामधे असुरक्षिततेची भावना असलेल्या व्यक्तीला हा रोग होतो. अडीअडचणीला कामाला येईल म्हणून आपण जसा पैसा जमवून ठेवतो, तसं ही व्यक्ती चरबी साठवून ठेवते. पण देशपांडे, या पारूनं मला चांगलंच गोंधळात टाकलंय. या सात आठ वर्षांच्या पोरीला असुरक्षितता कशाची वाटत असेल बरे..? आणि तसं म्हणावं तर तिचं वजनही वाढत नाही. इतकं खाऊनसुद्धा ती आहे तशीच आहे. तिचं मानसिक कारण काहीतरी वेगळंच असावं आणि ते शोधून काढण्यासाठी म्हणूनच मी तिला संमोहनावस्थेत नेण्याचं ठरवलं होतं. पण जे झालं घडलं ते भलतंच. अगदीच विलक्षण, अनपेक्षित, अविश्वसनीय. अंगात आलेल्या बायका पुरुषी आवाजात परक्या बाषेत बोलतात, काही तर अस्खलित इंग्रजीत बोलतात हे मला माहीत आहे. पारूच्या तर अंगातही आलं नव्हतं. तिला मी संमोहनावस्थेत नेलं होतं. आणि तरीही -"

"ती नाटक तर करत नसेल ना..?" देशपांडे म्हणाले.

"नाही देशपांडे, तिला नाटक करण्याचं कारणच काय..? घरामधे दुर्लक्षित व्यक्ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अंगात येण्याचं नाटक करतात. त्याला मॅलिंगरिंग म्हणतात. पारूला तशी गरजच नाही. रखमाला तिची काळजी आहे हे आपण पाहतोच आहोत की. आणखी बरीच कारणे आहेत. हिस्टेरिया, मॅनिया. पण यातलं कोणतंच कारण पारूला लागू पडत नाही. अंगात आलेली व्यक्ती निरर्थक बडबड करते, तिला ग्रासोलोलिया म्हणतात. पण पारूचं बोलणं निरर्थक वाटत नव्हतं. खरं होतं, नाही देशपांडे, ते नाटक नव्हतं. तो झुंगू अगदी खरा वाटत होता."

"म्हणजे तिला भुतानं पछाडलंय असं म्हणायचं आहे का तुम्हाला..?"

"मी काही यातला तज्ज्ञ नाही. पण याविषयात रस नक्कीच आहे. कोणत्याही अपारंपरिक घटनांचा अभ्यास करणे, त्यांच्या नोंदी ठेवणे हाच तर माझा छंद आहे."

"पण आता या पारूचं काय करायचं..?" देशपांड्यांनी विचारलं.

"तिला एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जायला हवं. तिला लागणार खर्च हवं तर मी करीन. पण देशपांडे, पारूचा मला पुन्हा एकदा अभ्यास करायला हवा. मला जर गरज पडली तर तिला पुन्हा आणता येईल..?" जेजी म्हणाले,

"हो.. हो.. त्यात काही अवघड नाही. रखमा माझ्याकडेच काम करते.. तुम्ही केव्हाही सांगा.."

~~~~~~~~~

क्रमशः...

(तळटीप: - ग्रुपवरील अ‍ॅडमीनच्या पूर्वपरवानगी शिवाय ही कथा इतर कुठेही पोस्ट करण्यास सक्त मनाई आहे.)

भाग ०४                                                        भाग ०६

Wednesday 24 January 2018

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~ भाग ०४

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~
मूळ लेखक - नारायण धारप आणि डॉ. अरुण मांडे 
भाग ०४

संभाजीराव बोलायचे थांबले. ते खाली पहात टेबलावर बोटांनी टकटक आवाज करत होते. जेजींच्या ध्यानात आलं - वेळ मोठा बांका होता. अधिकउणा एक शब्दही मुलाखतीचा बेरंग करू शकला असता. पण मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मनात जो विषय सतत घोळत असतो, त्याचं सूतोवाच करायला आपोआपच त्यांच्यासमोर एक नामी संधी चालून आली होती. खुर्चीवर जरा पुढे वाकून जेजी म्हणाले, "संभाजीराव, तुम्हाला दिसलेल्या दृश्याचा आपण दोन दिशांनी विचार करू शकतो. ज्या अर्थी गणपतला - आणि अर्थात नंतर तुम्हालाही - त्या खोलीत दिसलं नाही त्या अर्थी त्या दृश्यास सत्यसृष्टीतलं कोणतंही परिणाम नव्हतं - याचा अर्थ ते दृश्य एका अर्थी असत्य होतं. तुमच्यापुरती साकार झालेली एक प्रतिमा होती - पण एखाद्या घटनेला केवळ असं एखादं लेव्हल लावून त्या घटनेचं स्पष्टीकरण होत नाही. समजा तुम्हाला भास झाला - पण तो का झाला..? आणि तुम्हाला त्यात असं शोकांत, जरा भयानक असं दृश्य का दिसलं..? संभाजीराव, गेली कितीतरी वर्ष मी या घटनांचा अभ्यास करीत आहे आणि माझ्यापुरती मी एक उपपत्ती निर्माण केली आहे."

एक हात वर करून संभाजीरावांनी जेजींना मधेच थांबवलंच. जेजींना वाटायला लागलं आपण या संभाजीरावांच्या अगत्याचा गैरफायदा घेत आहे. आवाज जरा खाली आणून जेजी म्हणाले, "संभाजीराव माझ्या ध्यानातच राहिलं नाही, की तुमचा वेळ अतिशय मोलाचा आहे - मी आपली व्याख्यानबाजीचं करीत राहिलो -"

जरासे हसत संभाजीराव म्हणाले, "डॉक्टर, एवीतेवी आपण एकमेकांशी प्रामाणिक राहायचं ठरवलंच आहे - तेव्हा ऐका - अहो, कसला महत्वाचा वेळ..? मला अशी काय मोठी कामं असतात..? हे ऑफिस म्हणजे नाटकातला एक देखावा आहे. बाकी काही नाही. वडिलोपार्जित गडगंज संपत्ती हाताशी आहे - कुशल आणि प्रामाणिक सल्लागारांच्या मदतीने मी तिची राखण तर केलीच आहे - त्यात थोडीफार भरही घातली आहे. डॉक्टर, तुम्हाला कल्पना नाही, मला भेटायला येणाऱ्यांपैकी पंच्याण्णव टक्के लोक मनाशी काहीतरी उद्देश ठेवून येतात. पैसे आहेत ना, मग कोण कोण तिकडे आकर्षित होईल काय सांगता येणार..? तुमच्याशी मी ज्या मोकळेपणाने बोललो तितका कितीतरी दिवसात कोणाशीही अगदी कुटुंबातल्या व्यक्तीशीही बोललो नाही. मला काहीही काम नाही. हवा तेवढा वेळ आहे. तुम्हाला थांबवलं ते एवढ्यासाठी की आपली एक कॉफी होऊन जाऊ दे. मग आपल्याला हवा तेवढा वेळ आहे. ठीक आहे..?"

जेजींनी हसत मानेनेच होकार दिला.

कॉफीचे मग हलवले गेल्यानंतर जेजी म्हणाले, "संभाजीराव, जरा विषयांतर करून बोलतो. सुरुवातीस माझे शब्द तांत्रिक क्लिष्ट वाटतील, पण जरा दमाने घ्या. रोजचं उदाहरण घेतो. आपण हातावर हात चोळले की हात गरम होतात, उष्णता निर्माण होते. कुठून आली ही उष्णता..? हातांच्या गतीमुळे निर्माण झाली. म्हणजेच घर्षणाने निर्माण झाली. हातावर हात घासण्याची शक्ती ही यांत्रिक शक्ती. तिचं उष्णतेच्या शक्तीत रूपांतर झालं. जगात हे शक्तीचं रूपांतर सर्वत्र, सदासर्वकाळ चाललेलं आहे. वाहत्या पाण्याच्या शक्तीतून विद्द्युतशक्ती निर्माण होते. विद्द्युतशक्तीतून उष्णता आणि शेवटी प्रकाश निर्माण होतो. थोडक्यात एक प्रकारची ऊर्जा दुसऱ्या प्रकारात रूपांतरित होते."

"संभाजीराव, आता आपण आपल्या मनाचा विचार करू. मनात विचार येत असतात. हाही मानसशक्तीचाच एक सौम्य अविष्कार आहे. जेव्हा माणूस काही ना काही कारणाने संतप्त होतो, उद्दीपित होतो, तेव्हा त्याच्या मानसशक्तीची मात्रा खूपच वाढलेली असते. आता यात माझ्या मनातील कल्पना सांगतो. काही काही जागा, परिसर, अवकाश, वास्तू अशा असतात की त्यांच्यात या मानसशक्तीचं रूपांतर दृश्य वा श्राव्य वा स्पर्श रूपात करण्याची क्षमता असते. एकदा हा साधा विचार स्वीकारला की अनेक गोष्टीचं स्पष्टीकरण करता येऊ शकेल. आता तुम्हालाच आलेल्या अनुभवाचं उदाहरण घेऊया. त्या आधी आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवायला हवी. आपल्या मनाचे सर्वच व्यापार आपल्याला ज्ञात नसतात. काही काही जाणिवेच्याही खालच्या, अव्यक्त पातळीवर चाललेले असतात. आपल्याला ते ज्ञात नसतात, पण त्यांची सत्यता नाकारता येत नाही. या अव्यक्त, अनकॉन्शस विचारांचे विलक्षण परिणाम झालेले दिसतात. त्या मानसशास्त्राशी आपल्याला याक्षणी काही कर्तव्य नाही. अव्यक्त पातळीवरच्या विचारांची सत्यता स्वीकारली की मग घटनांचं स्पष्टीकरण अधिक सुलभपणे होऊ शकतं."

"तेव्हा तुम्हाला आलेला अनुभव. खोलीत कोणीतरी एका अभागी माणसाने आत्महत्या केली होती. जरा खाजगीतील गोष्ट आहे - पण रागावू नका. रावते सरदारांच्या इतिहासात असे प्रकार झालेले आहेत, हो की नाही..? त्या वाड्यात वावरताना कळत नकळत तुमच्या मनात मागच्या या शोकांत घटनेचा काही ना काही विचार चाललेला असणारच पण या वस्तूचा विलक्षण गुणधर्म हा आहे की या अवकाशात मनातल्या विचारांना एक दृश्य स्वरूप येऊ शकतं. तुम्हाला आलेल्या अनुभवाचं माझ्यापुरतं मी केलेलं हे स्पष्टीकरण आहे. अर्थात हे परिपूर्ण नाही. समोर दृश्य झालेला आकार मायावी, भ्रामक, निरुपद्रवी असतो का त्याच्यामधे एखादी विनाशकारी तामसी शक्ती असते..? अनुत्तरित प्रश्न."

"या अनुषंगाने आता मी तुमची कशासाठी भेट घेतली हे सांगण्याची संधी मला मिळाली आहे. ती सांगण्यापूर्वी व्यवहारातलं आणखी एक उदाहरणं देतो. सर्वच पदार्थ उघड्यावर ठेवले की त्यांच्यावर काहीना काही परिणाम होतो. काही बाष्पाच्या रूपाने हवेत कणाकणाने झिरपतात, काही पाणी शोषून जरा दमट होतात, काहींचा प्राणवायूशी संयोग होऊन ते गंजतात. पण काही काही पदार्थांमधे हे गुण अति तीव्र मात्रेमधे असतात. उदाहरणार्थ - आयोडीन. आयोडीनचे स्फटिक उघड्यावर ठेवले तर त्याचा पाहता पाहता वायुरूप आयोडीन होऊन जातो. ते कॅल्शिअम क्लोराईड ते डब्यावर ठेवलं तर इतकं पाणी शोषून घेतं की शेवटी त्याचा अगदी लगदा होतो. नाहीतर तो सोडियम धातू - तो जर उघड्यावर ठेवला तर प्राणवायूशी संयोग करून इतका तापतो की खालचा कागदही होरपळेल. तो सतत पाण्यातच ठेवावा लागतो. माणसाच्या मानसिक व्यवहारातही असा मात्रांचा फरक असतो. संभाजीराव तुमच्या मनात अव्यक्तपणे आलेली कोणा पूर्वजाच्या आत्महत्येची आठवण अगदी पुसट होती - तरीही या वास्तूत तिला एक दृश्य साकार आला. पण ज्यांचे विचार असे खोलवरच्या पातळीवर दडपलेले नाहीत, त्यांचा निर्यास अगदी सतत होत असतो असं जर कोणी या वास्तूत आलं तर..? हा प्रश्न विचारण्याचं एक कारण आहे. इतक्या दिवसांच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर माझी खात्री पटली आहे की अशा अनैसर्गिक घटनांशी काही खास मानसिक धाटणीचे लोक आणि शिवाय काही विशिष्ट गुणधर्म असलेला अवकाश या दोन्हींची आवश्यकता असते. तुमच्या माहूलगावचा वाडा ही या दृष्टीने अगदी आदर्श अशी जागा आहे. गावापासून दूर, उत्तम स्थितीत, राहण्याची छान सोय असलेली अशी जागा म्हणजे एकतर अंधाऱ्या पडक्या वाड्यातली तळघरं, नाहीतर गावठाणाबाहेर मसणवटीजवळचा एखादा मोठा वृक्ष नाहीतर रानावनातली आडबाजुची एखादी कपार - अशा असतात."

"पण तुमच्या मनात काय आहे ते तुम्ही अजून सांगितलं नाही डॉक्टर..!"

"ही सगळी प्रस्तावना त्याच्यासाठीच तर आहे. तुम्हाला सांगितलंच आहे, अशा घटनांची मी तपशीलवार नोंद ठेवत असतो. त्यात घरावर दगड पडण्याचे - ज्याला लोक भानामती म्हणतात असे प्रकार आहेत. एखाद्या व्यक्तीला ती राहात असलेल्या जागी आपल्या पूर्वजन्मीच्या आठवणी आल्याचे प्रसंग आहेत. आणखीही कितीतरी. पण म्हणजे व्यक्ती आणि स्थान दोन्ही घटक महत्वाचे आहेत."

"संभाजीराव आता माझ्या मनातली कल्पना सांगतो. तुमची जर परवानगी असेल तर माहूलच्या तुमच्या वाड्यामधे पूर्वी ज्यांना ज्यांना हे अनुभव आले आहेत अशी माणसं काही दिवसांसाठी राहायला आणायची आणि हे दोन घटक एकत्र आले की काय होतं ते पाहण्याची माझी कल्पना आहे. तुम्हाला आधीच सांगतो - केवळ शाब्दिक परवानगी देण्यापलीकडे तुम्हाला कोणतीही तोशीस पडणार नाही. त्याचप्रमाणे त्या वास्तूत काहीही घडलं तरी त्याची कोणतीही जबाबदारी तुमच्यावर येणार नाही याची मी तुम्हाला लेखी हमी देईन. सर्व परिणामांना सर्वस्वी आम्हीच जबाबदार असू."

"पण डॉक्टर, तिथं तर जेवणाखाणाची काहीच सोय नाही."

"गणपत मिस्त्रीच्या ओळखीने सकाळ संध्याकाळच्या स्वैपाकासाठी आणि धुण्याभांड्याचं काम करण्यासाठी एखादी बाई मिळेल अशी माझी खात्री आहे. मला माहीत आहे, माहूलगावातलं कोणीही वाड्यावर मुक्कामासाठी राहायला तयार होणार नाही - पण आम्ही ती अपेक्षाही करीत नाही. सूर्योदयानंतर बाईने नेमानं भांडी साफ करावीत, सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक करून ठेवावा. आणि दुपारी धुणीभांडी उरकून दिवस मावळायच्या आत परत गावाकडे जावं. मला वाटतं मनासारखा पगार मिळाला तर एवढ्या कामासाठी बाई नक्कीच मिळेल."

"डॉक्टर, हे सगळे तुमचे अंदाज आहेत. माझा तर तुम्हाला सल्ला आहे की या भानगडीत तुम्ही पडूच नये - पण अगदी मनाशी ठरवलंच असलं तर गावाला पुन्हा एकदा भेट द्या. तुम्ही म्हणता तशी सोय होण्यासारखी आहे का ते पहा - मग आपण पुन्हा भेटूया - माझ्या परवानगीचं म्हणत असाल तर तुमच्या विनंतीला नकार कसा देणार..? शेवटी सर्व जबाबदारी तुम्हीच आपल्या शिरावर घेत आहात की..!"

"संभाजीराव, मी तुमचा खरोखरच आभारी आहे. मनात कल्पना तर आहे - आता काय काय कसं जमतं त्याचा अंदाज घेतो आणि मग पुन्हा आपली भेट घेतो."

जेजी खुर्चीवरून उठताच संभाजीरावही उठले. आणि जेजीचा हात हातात घेत म्हणाले, "डॉक्टर, आज मला खूपच नव्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. तुमची कल्पना प्रत्यक्षात येवो अथवा न येवो आपल्या भेटीगाठी चालूच राहाव्यात अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. रोजच्या घटनांकडे एका एकदम वेगळ्याच नजरेने पाहण्याची दृष्टी तुम्ही मला दिली आहे. त्याबद्दल मला तुमचे आभार मानायला हवेत."

संभाजीरावांना नमस्कार करून जेजी त्यांच्या कार्यालयामधून बाहेर पडले. माहूलगावला दिलेली भेट जशी कल्पनेबाहेर यशस्वी झाली होती. तशीच संभाजीरावांची भेटही अत्यंत आशादायक ठरली होती.

संभाजीरावांनी फारसे आढेवेढे न घेता वाड्यावर मुक्काम करायची परवानगी दिली त्यामुळे जेजींना मोठाच हुरूप आला होता. आता त्यांना आपल्या पुढच्या सर्व कार्यक्रमांची आखणी करण्याचा मार्ग खुला झाला होता. वाड्यावरच्या दोन तीन दिवसांच्या मुक्कामाची त्यांना फारशी फिकीर वाटत नव्हती. दोनतीन दिवस पुरतील असे अन्नपदार्थ बरोबर ठेवले की जेवणाखाण्याचा प्रश्न मिटला. शक्यतोवर पेपर डिश आणि प्लॅस्टिक ग्लास वापरले की भांड्यांचाही प्रश्न निकालात निघत होता. वाड्यावर विहीर असणार. तेव्हा पाण्याचा प्रश्नही नव्हता. ज्यांना ज्यांना ते निमंत्रण करणार होते त्यांनी स्वतःबरोबर तीन दिवसांचे कपडे आणि झोपण्यासाठी होल्डऑल आणायचा होता. तेव्हा गाद्या-चादरी-उशा यांचाही प्रश्न नव्हता. आता वाड्यावर जाण्यासाठी कोणाकोणाची निवड करायची हे ठरवण्याची वेळ आली होती. आणि अर्थात त्यांनी निमंत्रण दिलं की सगळे अगदी लगोलग तयार होतील असं मानून चालणंही चूक ठरणार होतं. काहींचे पत्ते बदलले असतील. काहींना-विशेषतः स्त्रियांना - घरातून विरोध होण्याची शक्यता होती. पूर्वीच्या अनुभवाने जीव पोळल्यामुळे पुन्हा त्या वाटेला न जाण्याचा निर्धारही काहींनी केला असेल. एवढ्या असंख्य चाळण्यातून गाळून शेवट हातात पाचसहा नावं आली तरी भाग्यच. जेजी स्वतःशी विचार करत होते - अनुभव वीस वर्षांपूर्वीपेक्षा जास्त मागचा नको. तसंच व्यक्तीचं वय साधारण पस्तीस छत्तीसपेक्षा जास्त नको.

त्यांच्या टिपणवहीतली नावं पाहता पाहता एका नावापाशी थांबले.

~~~~~~~~~

अनंत सीताराम जोशी. वय वर्ष चौदा. वडील भिक्षुकी करणारे. आई घरीच पापड कुरड्या, इत्यादी जिन्नस करून विकत असे. शहरातल्या अगदी जुन्या वस्तीत दामले यांची एक चाळ वजा इमारत होती. तीसपस्तीस भाडेकरू तरी नक्कीच असतील. हे जोशी कुटुंब तिसऱ्या मजल्यावरच्या दोन खोल्यांच्या जागेत राहात असे. वर छप्पर म्हणजे नालीचे पत्रे. तशी उन्हाळ्यात अंगाची अगदी लाही लाही व्हायची - पण त्या तापत्या छपराचा एका मोठा फायदा होता. अनंताची आई, जेनुबाई, तिचं कुरड्या, पापडांचं वाळवण पत्र्यावर करू शकत होती. वाड्यात अंगण होतं पण तिथे कधी ऊन असायचं नसायचं आणि वाड्यात वावरणारी व्रात्य पोरं अंगणात काय जिनसा टिकू देतात..? आणि वाळवणावर सतत नजर तरी कशी ठेवणार..? तसे सीतारामपंत कुडमुड्या भटजीच्या जातीचेच. जन्मभर हलाखीत दिवस काढल्याने कोणाकडे मान वर करून दोन शब्द सुनावण्याची हिम्मतच अंगात नव्हती. जानुबाई मात्र तोंडाने तिखट, अगंला लगेच कागं करणारी, कोणाचा एक शब्द खाली पडू न देणारी मोठी तोंडाळ बाई. नवल नाही वाड्यातल्या बिऱ्हाडांशी तिचा छत्तीसचाच आकडा होता. आणि मालक तर सदान् कदा संतापलेले. पत्रा काही तुम्हाला भाड्याने दिलेला नाही - त्याचा तुम्ही गैरवापर करता आहात - वकिलामार्फत नोटीसच देणार आहे - ते नेहमी धमकी देत - पण वकिलाच्या नोटिशीचे दहापंधरा रुपये देण्याची तरी त्यांची ऐपत कोठे होती..? बिऱ्हाडांची भाडी काय तर आठ दहा बारा रुपये अशी. शिवाय हजार तक्रारी. त्यानी ते आधीच कावलेले. त्यात ही आणखी भर घालून घ्यायची त्यांची कुवतच नव्हती. शेवटी मध्यमवर्गीय मन - खरे किंवा काल्पनिक अन्याय स्वतःवर चरफडत सहन करण्याची त्यांचीही मध्यमवर्गीय मानसिकता होतीच.

अशा या जोशी कुटुंबाचं नाव एकदम वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं. त्यांच्या पत्र्यावर रात्री दगड पडण्याचा आवाज यायला लागला. दगडांचा आवाज येत होता हे निर्विवाद सत्य आहे. त्याला अक्षरशः शेकडो लोकांचा पुरावा होता. आता अशी अनैसर्गिक घटना म्हणजे अफवांना निमंत्रणच की..! नाही नाही त्या तर्ककुतर्कांचं मोहोळ उठलं नाही तरच नवल..! अंधश्रद्धाळू आणि भाकडकथांवर विश्वास ठेवणारांच्यात पहिली आवई उठली ती भानामतीची. हौशे आणि नवशे सदासर्वकाळ असतातच. अपघात झाला तर ती जागा पाहायलासुद्धा माणसं जमतात. तेव्हा नवल नाही या जोश्यांच्या घराची वर्दळ एकदम वाढली तर..! इतर वेळी जनूबाई दिसली की नाक मुरडणाऱ्या शेजारणी "हे काय झालं हो..? असं कसं झालं हो..! काय अक्रित आलंय तुमच्यावर..!" असल्या कोरड्या आणि खोट्या सहानुभूतीचे चार थेंब टाकण्यासाठी जोश्यांच्या घरात यायला लागल्या. खरं तर सर्वांनाच जिथे दगड पडण्याचा आवाज येत होता ती छपरावरची पत्र्याची जागा पहायची होती. वर जायला बाहेरच्या खोलीतूनच शिडी होती आणि वर चार बाय तीनचं पत्र्याचंच वर ढकलून उघडायचं दार होतं. पण जनुबाईनी त्या दाराला कुलूपच लावून टाकलं होतं. कोणालाही वर जाऊ दिलं नाही.

अर्थात प्रकरण शेवटी शेजारच्या पोलीस चौकीपर्यंत पोहोचलंच. अर्थात तसा कोणालाही प्रत्यक्ष त्रास किंवा इजा किंवा नुकसान झालं नव्हतं. पोलीस तरी काय नोंद करणार..? पण एकदोन वजनदार लोकांच्या आग्रहाखातर शेवटी एक साधा पोलीस चौकशीसाठी जोश्यांच्या घरी आला आणि अर्थात त्याच्यासाठी आणि त्याच्याबरोबरच्या वशिल्याच्या एकदोघांसाठी - जनुबाईना वरचं दार उघडावं लागलं. पत्र्याचा आकार साधारण बावीस बाय बाराचा होता. पण वर येताच आधी दिसले ते साधारण मुठीएवढे पाचसहाशे ग्रॅम वजनाचे पंधरा सोळा दगड आणि अर्ध्या विटांचे चारपाच तुकडे. त्या तुकड्यांकडे पाहात शिपाई म्हणाला, "म्हणजे लोकांना दगडाचा आवाज येत होता हे तर खरंच आहे..."

"नाही नाही तसं नाही.." जनूबाई म्हणाल्या.

"तसं नाही..? मग हे दगड विटा आलं कोठून..?"

"अहो, मीच अंताला खालनं आणायला लावलेत.."

"तुम्ही.."

"अहो हे पहा -" जनुबाईंनी कोपऱ्यातली एक मोठी वीट उचलली आणि तिच्याखाली ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या घड्या आणि जुन्या साड्या दाखवल्या. "अहो, मी ही उन्हाळ्याची वाळवणाची कामं करते ना - पापड कुरड्या पापड्या ते इथं पत्र्यावर प्लॅस्टिकवर वाळत घातलेलं असतं - आणि वरून धूळ कचरा पडू नये म्हणून त्यांच्यावर चारी बाजूंनी दगड विटांचे तुकडे असं काहीतरी ठेवते - त्याकरता तर वर असे दगड आणून ठेवलेत."
"पण तुम्हीही दगड पडल्याचा आवाज ऐकलात की नाही..?"

"ऐकलं की..! साऱ्या जगाला ऐकू येतं ते मला येणारंच. पण हे दगड पहिल्यापासूनच आहेत एवढं सांगते -"

जनुबाईच्या शब्दांनी - ज्याला समोर प्रत्यक्ष पुरावा होता - सगळेच एकदम निरुत्तर झाले होते. पाचसात मिनिटं पत्र्यावरच घुटमळून मग शेवटी सगळे खाली आले. मागे जनूबाईंनी दाराला काडी लावून टाकली.

स्वतःशीच काहीतरी पुटपुटत पोलीस निघून गेला. बाकीची माणसंही आपापल्या घरी गेली. जेजींची नोंद थांबली होती. ही घटना एकोणीसशे शहाण्णव मधे घडली होती. म्हणजे बारा वर्षांपूर्वी. त्यावेळी त्यांनी नुकतीच डॉक्टरेट घेतली होती. या जरा आडमार्गावरच्या घटनांचा शोध घ्यायचा असा अर्धवट विचार मनात होता - म्हणून त्यांनी टीव्ही, वर्तमानपत्र, रेडिओ इत्यादी माध्यमातून आलेल्या अशा घटनांची नोंद करून ठेवली होती. पण त्यापुढे काही केलं नव्हतं. मग तीन चार वर्षांनी जेव्हा त्यांनी आपला जीवनमार्ग निश्चित केला तेव्हा या घटनांचा अधिक खोल तपास करण्याची आवश्यकता भासायला लागली.

मग एका सकाळी त्यांनी त्या जोशी कुटुंबालाच भेट द्यायचं ठरवलं, ते त्या पत्त्यावर गेलेही - पण जोशी जागा सोडून गेले होते. आणि त्यांची आसपासच्या कोणाशीच असे आपुलकीचे संबंध नव्हते, की ज्यांना त्यांचा नवीन पत्ता जाणून घ्यायची इच्छा होती. म्हणजे जेजींचा शोध इथंच संपल्यासारखा होता. पण एक अगदी अंधुक अशा होती - सुरुवातीची नावं पाहता एक नाव त्यांच्या समोर आलं.

अनंत सीताराम जोशी

मोठीच दिलासा देणारी गोष्ट. हा अनंत तोच असला तर अर्थात - पण त्यांनी पत्ता आणि फोननंबर आपल्या टिपणवहीत ठेवला. वेळ पडली तर ते या अनंताची गाठभेट घेणार होते.

~~~~~~~~~

क्रमशः...

(तळटीप: - ग्रुपवरील अ‍ॅडमीनच्या पूर्वपरवानगी शिवाय ही कथा इतर कुठेही पोस्ट करण्यास सक्त मनाई आहे.)





भाग ०३                                                        भाग ०५

Sunday 21 January 2018

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~ भाग ०३


~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~
मूळ लेखक - नारायण धारप आणि डॉ. अरुण मांडे

भाग ०३

"वाड्याचं विचारता ना साहेब, तशा अनेक अफवा आहेत, हे खरं. एक मात्र खरं, चारपाच पिढ्यांपूर्वी सरदारांच्या घराण्यात भावाभावात काहीतरी बेबनाव झाला. इस्टेटीवरून असेल, बाईवरून असेल, नाहीतर आणखी काहीतरी कारणाने असेल - पण तंटा बखेडा झाला हे नक्की. प्रकरण वाढत वाढत अगदी विकोपाला गेलं - आणि असं म्हणतात की दोघांपैकी एकाने कोणीतरी मांत्रिक आणून काहीतरी चेटूक करणी केली. नवल आहे की या एका गोष्टीवर सर्वांचं एकमत आहे. वाड्यात बाहेरून काहीतरी आणलं गेलं ही गोष्ट खरी. हे सगळ्याचं मूळ. मग वर खऱ्याखोट्याच्या, कल्पित - अफवांच्या कितीतरी फांद्या फुटल्या आहेत. कोणी म्हणतात दुसऱ्या भावाने गळफास लावून स्वतःचा जीव दिला आणि मग भावाला पछाडलं, कोणी म्हणतात त्या दुसऱ्या भावाला वेड लागलं, मरेपर्यंत एका खोलीत कोंडून घातला होता, कोणी म्हणतात तो गायबच झाला, त्याची काही खूणसुद्धा सापडली नाही - पण मग अवशीला रात्री, अंधारात कोणकोणाला काहीकाही - ते भाऊचं असं, कोणी म्हणत नाही - दिसायला लागलं. खरी गोष्ट एकच आहे - वाड्यावर माणसाला राहणं दिवसेंदिवस कठीण व्हायला लागलं. तेव्हा आतासारखी वीजबत्ती कुठं होती..?

Saturday 20 January 2018

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~ भाग ०२


~ रावतेंचा पछाडलेला वाडा
मूळ लेखक - नारायण धारप आणि डॉ. अरुण मांडे

भाग ०२

चौकातली छत्रपती खानावळ - आत जेवणाऱ्यांची गर्दी बरीच होती. जेजी सरळ आत गेले. गल्ल्यावरच्या माणसाला विचारलं, "मालक आहेत का...?" त्याने एका हाताने आतली खूण केली. जेजी आत गेले. एका जुन्या टेबलामागे एक वयस्क माणूस काहीतरी कागद वाचत बसला होता. जेजींना पाहताच तो जरा सावरून बसला, "नमस्कार..." जेजी म्हणाले. "आपण खानावळीचे मालक...?"

"........"

"तुमच्याकडे खोल्या आहेत म्हणून समजलं. मला एखादी मिळेल का...?"

"तुम्हाला साहेब...? इथं खोली हवी...?"

"निदान एका रात्रीसाठी तरी - भाड्याचा प्रश्न नाही..."

"साहेब तसं नाही. तुम्ही जंटलमन पडला. सांगायचं तरी कसं...?"

"एवढी काय अडचण आहे...?"

"साहेब..." पुढे वाकून हलक्या आवाजात म्हणाला. "वरच्या खोल्या कोण वापरतं माहीत आहे का..?" एक डोळा मिचकावून डाव्या हातानी तर्जनी नाकावर आपटत तो म्हणाला, "साहेब वर धंदा चालतो - रात्रभर चाललेला असतो. आता सांगा तुमच्यासारख्याला तिथं राहवेल का...?"

जेजींना याची अजिबात कल्पना नव्हती.

"म्हणजे समजा इथं एखादी रात्र काढायची वेळ आली तर कुठेच सोय होण्यासारखी नाही म्हणा की...!"

"तुम्ही म्हणता ते खरं आहे साहेब - त्याचं काय आहे - गावाला कधीकधी ते फौजदार मामलेदार, झेडपीचे कोणी अधिकारी असे भेट देतात ना तेव्हा ते सगळे पाटलाच्या घरी उतरतात...."

म्हणजे हा आता आपल्याला त्या पाटलाच्या वाड्याचा पत्ता देणार. जेजींनी आता या कोण म्हणतं टक्का दिलाच्या खेळाचा कंटाळा आला होता. हॉटेलवाल्यानं गणपत मिस्त्रीकडे, त्याने खाणावळल्याकडे पाठवलं - आता हा आपल्याला त्या पाटलाचा पत्ता सांगणार - मालकाला मधेच थांबवत जेजी म्हणाले, "हे पहा - दुपारी दोनला मला एकाची भेट घ्यायची आहे. ती झाली की मग गावात मुक्काम करायची वेळच यायची नाही. माझी एक विनंती आहे, दुपारी दोन वाजेपर्यंतचे दोन तास मला वरची खोली वापरायला देता का...? तसा पैशाचा प्रश्न -"

"साहेब, काय आम्हाला लाज आणता...! अहो, खुशाल वापरा - "

"वा..! छान...! आभारी आहे...!" म्हणत जेजींनी झिपबॅग उचलली. तिथेच कोपऱ्यात मोठ्या टिनच्या ड्रमला खाली नळ लावला होता. त्या नळाखाली हात तोंड धुतलं. आणि वरची वाट धरली. खिडक्या पूर्वेला होत्या आणि आता खोलीत छान गारवा आला होता. खोलीत एक लोखंडी पट्टीची खाट होती वर गादी. चार उशा दोन चादरी. भिंतीपाशी आरशाचा ड्रेसर आणि एक दोन खुर्च्या.

कॉटवर बसून जेजींनी बॅग उघडली. खाद्यपदार्थांच्या पिशव्या बाहेर काढल्या. दोन पोळ्या, भाजी, चटणी असं व्यवस्थित खाऊन घेतलं. वर थंडगार पाणी प्यायल्यावर सर्व वस्तू बॅगमधे परत भरून ते कॉटवर आडवे झाले. सकाळपासूनच्या पायपीटने जरा थकवा आलाच होता. पाहता पाहता त्यांचा डोळा लागला. जाग आली तेव्हा पावणेदोन वाजले होते. आरशात पाहून केस सारखे करीत त्यांनी बॅग उचलली. खालचा रस्ता धरला. मालक आता काउंटरपाशी हिशोब करीत बसले होते. जेजींना पाहताच ते जरा हसून म्हणाले....

"काय मिळाला का आराम...?"

"अगदी छान. पुन्हा एकदा आभार." जेजींनी हातातली वीसची नोट काउंटरवर ठेवली. एकदम मागे सरत मालक म्हणाले,

"अहो, साहेब..! हे काय..?"

"अगदी योग्यच आहे." जेजी हसत म्हणाले, "राहू द्या हो, आठवण..."

एक हात वर करून त्यांचा निरोप घेऊन जेजी बाहेर पडले.

~~~~~~~~~

वर्कशॉपबाहेर गणपत मिस्त्री त्यांची वाट पाहात होता.

"काय उरकलं काम...? झालात मोकळे...?" जेजींनी हसत विचारले.

"हो तुमचीच वाट पहात होतो साहेब."

"अहो मिस्त्री, एक सांगा, हा वाडा गावात आहे तरी कुठं...?"

"गावात नाही साहेब, गावाबाहेर अडीच तीन मैलांवर आहे," जेजींचा चेहरा पाहून मिस्त्री हसत म्हणाला, "साहेब आपली मोटारसायकल आहे ना - चलता...? पंधरा मिनिटात वाड्यावर पोहोचूया -"

"पण नुसतं बाहेरून पाहून काय फायदा होणार आहे...?"

"बाहेरून कशासाठी...? चांगला आतून दाखवतो की..."

"आतून...? पण -"

"त्याचं काय आहे साहेब. सरदार स्वतः महिन्या दीड महिन्याकाठी इथं येतातच, मग बरोबर मी आणि गावातला एखादा बिगारी घेऊन वाड्यावर येतात - खालपासून वरपर्यंत नीट पाहणी करतात - काही बारीकसारीक काम निघाले तर मला ते करायला सांगतात - आणि बिगाऱ्याकडून एकदोन दिवसात वाड्याची साफसफाई करून घेतात -"

"पण सरदारांचा मुक्काम कुठं असतो...?"

"ते कसले गावात राहायला हो..! आले की चार तासात पाहून घेतात की लगोलग परत. पण माझ्यापाशी किल्ल्या ठेवून जातात - जे काय एक दोन दिवस लागतील तेवढ्यापुरता मी वाड्यावर असतो -"

जेजी काहीच बोलले नाहीत. निदान एक तरी, आणि सगळ्यात महत्वाचं काम आज होणार असं दिसत होतं. प्रत्यक्ष त्या वाड्यावर भेट..!

गणपतने किक मारून गाडी सुरू केल्यावर जेजी मागे बसले. गाडी खडीच्या रस्त्यावरून धूळ उडवीत निघाली आणि खरोखरच दहा मिनिटांत वाड्याच्या चिरेबंद तटापाशी पोचली. गाडीवरून उतरल्यावर जेजी समोरच्या त्या प्रचंड दरवाजाकडे नवलाने पाहात होते. मनावर छाप पाडणारं आणि एक प्रकारचा दबाव आणणारं दृष्य त्यांना वाटलं.

गणपतने, गाडी स्टँडवर लावली, इंजिनची किल्ली काढून घेतली. आणि मग खिशातून मोठा किल्ल्यांचा एक जुडगा काढला. त्यापैकी एक निवडून त्याने दरवाजातल्या दिंडीच्या कुलुपाला लावली. गणपत आणि त्याच्या मागोमाग जेजी दिंडीतून वाकून आत शिरले.

समोर फरसबंद अंगण आणि त्याच्यापुढे तीन मजली इमारत. मागून गणपतची हाक आली - "साहेब हे पहा -"

जेजींनी मागे वळून पाहिलं - गणपत बंद दाराकडे बोट दाखवीत होता. तो काय दाखवत होता हे पाचसात सेकंदांनी जेजींच्या लक्षात आले. तुळईसारखे जाड-जाड तीन अडसर आणि मधल्या कोयंड्यात कधी पाहिली नव्हती अशी जाडजूड कडी. बचावासाठी केवढी तयारी..! मग त्यांना उमगलं - एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीचा कालच असा धामधुमीचा, असुरक्षिततेचा होता. जेव्हा हा वाडा बांधला गेला होता किंवा कदाचित त्याआधीही पंचवीसतीस वर्षं, तेव्हा सुरक्षिततेसाठी हे आवश्यकच होते...

गणपत पुढे निघाला आणि वाड्याच्या मुख्य दारातली दिंडीही त्याने जवळच्या किल्लीने कुलूप उघडून आत ढकलली. जेजी त्याच्यामागोमाग आत गेले. आत एक बोळ. दोन्ही बाजूंना देवड्या आणि वरच्या मजल्याकडे जाणारे जिने, समोर मोठा फरसबंद चौक. गणपत मागोमाग ते चौकात आले. चारही बाजूंनी तीन मजली इमारत. सर्व खोल्यांची दारं तिथे उघडत होती, ती सर्व दारं आत्ता बंद होती.

जेजी गणपतकडे वळून म्हणाले, "मिस्त्री तुमच्या जेवणाचं काय..?"

"आता तुमचं काम झालं की मग जेवण साहेब.."

"मिस्त्री, खरं सांगू की, मी बरोबर पोळीभाजी आणली होती, त्यातली काही शिल्लक आहे. पाणीही आहे. तुम्हाला चालत असेल तर..."

"साहेब न चालायला काय झालं...? अन्नाला कुणी नाही म्हणतं का..?"

"मग या बसा.." देवडीवर बॅग ठेवून जेजीनी बॅग उघडली. आतल्या पोळ्या, भाजी, चटणी गणपतसमोर ठेवली, शेजारी थरमॉस ठेवला. "तुमचं खाणं होऊ द्या. तोवर मी वाड्याला एक चक्कर टाकून येतो - मग आपण सावकाश बोलूया काय...?"

"या ना, सावकाश पाहून या. पण साहेब, खोल्या पाहून झाल्यावर दारं बंद करायला विसरू नका - नाहीतर पाखरं बिखरं काहीतरी आत जायचं.."

"हो अगदी नीट ठेवीन..." जेजी म्हणाले.

~~~~~~~~~

डाव्या जिन्याने ते वर आले. डावीकडे एकेक खोली पाहात निघाले. कोणत्याही दाराचा आवाज होत नव्हता. बिजागरांना व्यवस्थित तेलपाणी केलेलं असावं. आत कोठे घडवंच्या, कोठे चौकोनी बैठी आसनं असं सामान होतं. भिंतींना कपाटं होती - पण ती सर्व रिकामी होती. थोडी बहुत धूळ सगळीकडेच होती. पण भिंतींचा आणि दारंखिडक्यांचा झडलेला रंग एवढी गोष्ट सोडली तर इमारत उत्तम अवस्थेत होती. दुसरा मजला पाहून झाल्यावर ते उजव्या बाजूने वर तिसऱ्या मजल्यावर आले आणि एक एक खोली पाहात पुढे निघाले.

ते त्या खोलीच्या दारासमोर आले मात्र -

एकदम भोवंड यावी तसं वाटलं. पायाखाली एकदम खोल काळी गर्ता उघडावी, असं वाटलं. उजव्या खोलीच्या बाजूने एखाद्या पाण्याचा प्रचंड लोट अंगावर येत आहे अशी भावना झाली. किंवा एखाद्या खोल खोल धबधब्याच्या काठावरून आपण खाली खोल पडतो आहोत अशी भावना झाली -

विजेचा झटका बसल्यासारखे ते एकदम दोन पावलं मागे सरले.

त्यांना हा अनुभव सर्वस्वी नवा होता. जेजींनी आतापर्यंत कितीतरी स्थळांना भेटी दिल्या होत्या, ज्या स्थळांबद्दल पछाडल्या गेल्याच्या, झपाटल्या गेल्याच्या अफवा होत्या. पण त्यांना स्वतःला आजवर कधीही काहीही जाणवलं नव्हतं. कदाचित आपल्यामधे ही प्रतियोगिता, ही सेन्सेटिव्हिटी नसावी असा त्यांचा समज झाला होता. पण तो समज किती खोटा होता.

पाचसात क्षणापुर्वी मनाच्या पायालाच जो एक जबरदस्त हादरा बसला होता तो थरकाप उडवणारा होता. मनातल्या गर्तेच्या किंवा पाणलोटाच्या किंवा धबधब्याच्या उपमा ही मनाची एक स्वाभाविक खटपट होती. स्पष्टीकरणे होऊ न शकणाऱ्या, ज्यांचा कधीही पूर्वानुभव नाही अशा घटनांना अनुभवातलं, आवाक्यातलं एखादं रूप देण्याचा हा प्रयत्न होता. शेवटी मनातल्या विचारांनासुद्धा एक मळलेला मार्ग लागतोच. मन स्वतः काहीही नवनिर्मित करीत नाही.

पण आता जेजींना या मर्यादा ओलांडाव्या लागणार होत्या. अभ्यास आता अकॅडेमिक पातळीवर राहिला नव्हता - तो एकदम वैयक्तिक पातळीवर आला होता - अनुभव आता त्यांना स्वतःच येऊन भिडला होता - त्याबरोरच हेही आलं की पूर्वीची वस्तुनिष्ठता टिकणे आता कठीण होणार होतं.

ते उजव्या हाताच्या बंद दाराकडे पाहात होते - जिथून काही क्षणापुर्वीच्या विलक्षण अनुभवाची लाट त्यांच्यावर आदळली होती - आता त्यांनी काय करायला हवं..?

तो अनुभव पुन्हा एकदा घ्यायचा..? पण त्या उद्रेकी कल्लोळापुढे त्याचं मन टिकाव धरू शकलं नाही तर..? त्याचा चुराडा चोळामोळा झाला तर..? पण त्यांना आपल्या प्रतिक्रियेचं नवल वाटत नव्हतं, कारण ती अगदी प्रतिनिधिक होती. एकदा चटका बसल्यानंतर सर्वसामान्य मनासासारखे मागे सरणार होते...? त्यांचा अभ्यासकाचा आव काय नाटकी होता..?

आपल्याही कसोटीचा हा क्षण आहे, त्यांना वाटलं.

आणि त्यांनी आपला निर्णय घेतला.

एक एक पाऊल पुढे टाकत ते चालायला लागले - खोलीच्या दारापासूनचं अंतर कमीकमी होत चाललं तसं त्या आघाताच्या अपेक्षेने आपण आपलं शरीर आवळून घेतलं आहे हे त्यांच्या ध्यानात आलं -

आणि ते दारासमोर आले...

एक साधा सज्जा आणि साधं दार...

त्यांना काहीही जाणवलं नव्हतं...

आता आणखी एक प्रश्न - खोलीचं दार उघडून आत पाहायचं का...?

धाडस आणि साहस यांच्यातील सीमारेषा खूपच धूसर असते. पण जेजींना जाणवलं - हा काही त्यांचा एकट्याचा वैयक्तिक असा प्रश्न नव्हता. त्यांच्या मनात एक कल्पना आली होती. पंचेंद्रियांच्या पलीकडच्या काही संवेदनांना प्रतियोगी असणारी माणसं, त्यांना, या वेगवेगळ्या शक्तीच्या संयोगाने काही विलक्षण घटना घडू शकतील का हे त्यांना पाहायचं होतं. पण त्यांच्या आमंत्रणाने येणाऱ्या या व्यक्ती - ते स्वतःच त्यांचे मार्गदर्शक, नेता सल्लागार, असणार नव्हते का...? मग त्यांना पुढच्या वाटेत - काही धोके असेलच तर माहीत असायलाच हवे होते. जी गोष्ट करण्याची त्यांची स्वतःची हिंमत होत नव्हती, किंवा तयारी नव्हती अशा गोष्टी ते आपल्या सहकाऱ्यांना करायला ते कसे सांगू शकतील. त्यांनी आपला निर्णय क्षणभरातच घेतला.

समोरच्या दाराची कडी काढून दार अलगद आत ढकललं. अर्थात अपेक्षेने शरीर आखडून घेतलं गेलं होतंच पण त्यांना दिसलं की समोर एक साधी खोली होती. बाहेर उघडणाऱ्या समोरच्या भिंतीतल्या दोन्ही खिडक्या बंद होत्या - पण खोलीत अक्षरशः काहीही नव्हतं.

त्यांनी दार लावून घेतलं. आणि बाहेरून कडी घातली.

मघाचा अनुभव हा काही भ्रम भासाचा परिणाम नव्हता. काही क्षण तरी ह्या खोलीच्या आसपास 'कशाचा' तरी वावर होता. काहीतरी अमानवी प्रचंड शक्तीचा उत्सर्ग करणारं, त्यात सापडलेल्या मनाचा पार चोळामोळा करणारं, आता त्याचा मागमूसही नव्हता.

दोन स्पष्टीकरणं असू शकत होती.

एक तर ते स्थिर अचल असं नसेल आणि त्याचा वावर या सर्वच्या सर्व वास्तूमध्ये सर्वत्र होत असेल - म्हणजे सर्वत्र सावधानता बाळगायला हवी..!

किंवा दुसरं - त्यांचं त्या खोलीसमोरचं आगमन त्याला सर्वस्वी अनपेक्षित असेल आणि त्या काही क्षणात त्यांना त्याचं अस्तित्व जाणवलं होतं - मग लगोलग त्याने स्वतःला मागे - एखाद्या वेगळ्या मितीत - खेचलं असेल, किंवा स्वतःला अदृश्य अस्पर्श जाणिवेपलीकडचं असं एखादं रूप दिलं असेल.

स्वतःशीच विचार करीत पुढची एकएक खोली जरा सावधपणाने उघडून पाहात आणि मग आपल्या मागे बंद करीत त्यांनी तिसऱ्या मजल्यावरची पहाणी पूर्ण केली आणि दोन जिने उतरून ते खालच्या देवडीत येऊन पोहोचले.

खाणपिणं उरकून, एक विडी पेटवून गणपत भिंतीला टेकून आरामात बसला होता. जेजींना पाहताच तो जरा सावरून बसला. "जमलं का जेवणाचं..?" जेजींनी विचारलं.

"अगदी झकास.." गणपत म्हणाला, "तुमचं झालं सर्व पाहून..?"

"हो तसं पहाण्यासारखं काहीच नाही म्हणा.." जेजी म्हणाले, "निदान दिवसाउजेडी तरी काही नाही - आणि दिसण्याची अपेक्षाही नव्हती -" शेवटलं वाक्य उच्चारताना जेजी गणपतच्या चेहऱ्याकडे अगदी निरखून पाहात होते. पण त्याच्या चेहऱ्यावर नवल शंका सुटकेची भावना असं काहीही दिसलं नाही.

"मग काय निघायचं का परत साहेब..?"

"आता कसली घाई आहे..?" जेजी म्हणाले, "तुमचा तसा नास्ता झालाच आहे, बसू की जरावेळ आरामात गप्पागोष्टी करत - म्हणजे असं की मिस्त्री - लहानपणापासून तुम्ही गावात वाढलेले - वाड्यासंबंधात गावात काय बोलणं होतं, काय काय अफवा आहेत, तुमच्या कानावर आलेलं असणारंच - खरं तर तीच माहिती घेण्यासाठी मी माहुलगावात आलो आहे - आणि दुसरी महत्वाची गोष्ट - मला माहीत आहे तुमच्या मागे कामं असतात - वेळ वाया दवडून तुमचं नुकसान करायची माझी अजिबात इच्छा नाही - तेव्हा आधी हे घ्या -" जेजींनी खिशातून पाकीट काढलं आणि शंभराची एक नोट गणपतपुढे केली. हे उघड होतं की हे त्याला अगदी सर्वस्वी अनपेक्षित होतं.

"अहो साहेब..! हे काय भलतंच..!" जरा मागे सरत तो म्हणाला, "नाहीतरी चार वाजेपर्यंत रोज घरी आरामच करतो - आणि अशी काय हो मोठी कामाची रांग लागून राहिली आहे मागे..! छे..! पैसे कसले देता..!"

नोट मागे न घेता जेजी म्हणाले, "मिस्त्री ही रक्कम अगदी स्वखुषीने देत आहे. तशी बाहेरून वाड्याबद्दल काही काही माहिती मिळाली असती खरं-खोटं कोणास ठाऊक. पण प्रत्यक्षच वाडा आतून बाहेरून दाखवून तुम्ही माझ्यासाठी केवढं महत्वाचं काम केलं आहेत याची तुम्हाला कल्पना नाही - तेव्हा पैसे अगदी निःसंकोचपणे घ्या - " जरा विचार करून शेवटी गणपतने ती नोट खिशात घातली.

क्रमशः

(तळटीप: - ग्रुपवरील अ‍ॅडमीनच्या पूर्वपरवानगी शिवाय ही कथा इतर कुठेही पोस्ट करण्यास सक्त मनाई आहे.)

भाग ०१                                                 भाग ०३